भारतीय क्रिकेट संघात सध्या बदलाचे वारे वाहते आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंवरील वर्कलोड कमी करण्यासाठी त्यांना विश्रांती दिली जात आहे. तसेच एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी मालिका खेळल्या जात असल्याने टी२० विश्वचषक २०२१ नंतर गेल्या ८ महिन्यात भारतीय संघाचे कर्णधारपद ६ वेगवेगळ्या खेळाडूंनी भूषवले आहे. अशात भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याच्यासाठी या वेगवेगळ्या कर्णधारांसोबत काम करणे आव्हानात्मक राहिले असल्याचे त्याने सांगितले आहे.
द्रविड म्हणाला की, “हे आव्हानांनी भरलेले काम आहे. गेल्या ८ महिन्यांत आम्ही ६ कर्णधार बदलले आहेत. जेव्हा मी भारतीय संघाचे प्रशिक्षण करायला सुरुवात केली होती, तेव्हा आमचे असे काही नियोजन नव्हते. परंतु सध्या आम्ही खेळत असलेल्या सामन्यांची संख्या पाहता, याचे महत्त्व आणखी वाढते. सध्या वेळ अशी आहे की, अशा निर्णयांचा स्विकार करावा लागतो. सध्या कोरोनाची स्थिती असल्याने मला बऱ्याच लोकांसोबत काम करावे लागले आहे.”
“माझ्यासाठी हा अनुभव खूप रोमांचक राहिला आहे. खूप साऱ्या खेळाडूंना नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली आहे. आम्हाला संघातच आणखी संघनायक शोधणे आणि त्यांच्यातील क्षमता जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. आम्ही सातत्याने प्रयत्न केले आहे. आम्ही वेगवेगळ्या खेळाडूंना संधी दिल्या आहेत. गेल्या ८ महिन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा कसोटी क्रिकेटच्या बाबतीत थोडा निराशाजनक राहिला होता,” असेही द्रविडने म्हटले.
शेवटी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मुळे उभरते सितारे भारतीय क्रिकेटला मिळत असल्याने ही सकारात्मक बाब असल्याचे द्रविडने सांगितले आहे. “आम्ही आयपीएलदरम्यान नवनव्या वेगवान गोलंदाजांना पुढे येताना पाहिले आहे, जे अविश्वसनीय होते. खासकरून काही गोलंदाजांनी चांगल्या गतीसह गोलंदाजी केली. भारतीय क्रिकेटसाठी वास्तवात हे चांगले संकेत आहेत,” असेही त्याने म्हटले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अनुभवी भुवनेश्वरने ‘मालिकावीर’ बनत रचला इतिहास; ठरला पहिलाच भारतीय वेगवान गोलंदाज
‘मागच्या वर्षी डावलले पण यावर्षी टी-२० विश्वचषकात चहल गेम चेंजर ठरणार’, माजी दिग्गजांचे भाकीत






