आयपीएल २०२० च्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत असताना राहुल तेवतिया आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर रातोरात स्टार झाला होता. आता त्याला इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टी -२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.
मागील आयपीएल हंगामात किंग्स इलेवेन पंजाब संघाविरुद्ध झालेला सामना कोणीच विसरू शकत नाही. अंतिम ३ षटकात ५१ धावांची गरज असताना ३१ चेंडूवर नाबाद ५३ धावांची खेळी करत राजस्थान रॉयल्स संघाला सामना जिंकवून देणारा तेवतिया हा आपल्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
नुकतेच विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत चंदीगढ संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात फलंदाजी करताना १८७ च्या स्ट्राईक रेटने ३९ चेंडूवर ताबडतोड ७३ धावांची खेळी करत त्याने दाखवून दिले की त्याची भारतीय संघात का निवड करण्यात आली आहे. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ६ षटकार लगावले. या खेळीच्या जोरावर हरियाणा संघाला ५० षटकांच्या समाप्तीनंतर २९९ धावा करण्यात यश आले.
दिग्गज खेळाडू संघात असताना स्थान मिळवणे सोपे नव्हते – तेवातिया
राहुल तेवतीया याने एका मुलाखतीत म्हटले होते की, युजवेन्द्र चहल, जयंत यादव आणि अमित मिश्रा यांसारख्या दिग्गज फिरकी गोलंदाजांनी परिपूर्ण असलेल्या हरियाणा संघात स्थान मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. हरियाणा संघात फिरकी गोलंदाजांसाठी खूप कठीण स्पर्धा आहे. हरियाणा संघासाठी प्रदर्शन करत माझा फक्त आत्मविश्वास नाही वाढला तर खेळात सुधारणा करण्यातही मदत झाली.
आयपीएल २०२० मध्ये उत्कृष्ट कामगिरी
राजस्थान रॉयल्स संघासाठी अष्टपैलू कामगिरी करत त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्याने आयपीएल २०२० मध्ये खेळताना १४ सामन्यात २५५ धावा केल्या होत्या. आणि गोलंदाजी करतांना १० गडी देखील बाद केले होते. तसेच पंजाब संघाविरुद्ध केलेली कामगिरी सर्वांच्याच लक्षात राहील अशी होती. सामना पंजाब संघाच्या बाजूने झुकत असताना त्याने एकाच षटकात ५ षटकारांसह अर्धशतकी खेळी करत हा सामना राजस्थानला जिंकून दिला होता.
टी -२० क्रिकेटमध्ये स्ट्राइक रेट १५० पेक्षा अधिक
तेवतियाने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात लेग स्पिनर म्हणून केली होती. अशातच हरियाणा संघात अमित मिश्रा, युजवेंद्र चहल, जयंत यादव यांसारखे फिरकी गोलंदाज असताना, तेवतियाला संघात खेळण्याची संधी मिळत नव्हती. अशातच त्याचे प्रशिक्षक विजय यादव यांनी त्याला सल्ला दिला होता की, जर तुला संघात स्थान मिळवायचे असेल तर तुला गोलंदाजीसह फलंदाजीमध्ये देखील सुधारणा करावी लागेल. त्यांनतर त्याने फलंदाजीमध्ये सुधारणा करत संघात स्थान मिळवले. त्याने खेळलेल्या ६८ टी -२० सामन्यात ९६५ धावा केल्या आहेत. यात २ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर फिंचची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला माहित होते…’
रसेल, पूरनसह ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू गेलच्या ड्रीम टीममध्ये, सांगितले समावेशाचे कारण
रोहितचे टीकारांना सडेतोड उत्तर ‘प्रत्येक संघ मायदेशात आपल्या मजबुतीसह खेळत असतो, आम्हीही जेव्हा…’