इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल २०२१) ५१ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान शारजा येथे खेळला गेला. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात मुंबईने राजस्थानला ८ आठ गडी व ७० चेंडू राखून पराभूत करत, गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली. या सामन्यात पराभूत होताच राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२१ मधील सर्वात लाजीरवाणा विक्रम आपल्या नावे जमा केला.
राजस्थानच्या नावे नकोसे विक्रम
शारजा येथे झालेल्या या सामन्यात राजस्थानच्या फटकेबाज फलंदाजांनी कच खाल्ली. नॅथन कुल्टर नाईल, जिमी निशाम व जसप्रीत बुमराह यांच्या गोलंदाजीसमोर राजस्थानची वाताहत झाली. संघाला निर्धारित २० षटकात ९ बाद ९० धावा बनविण्यात यश आले. यासह राजस्थानने आयपीएल २०२१ मधील सर्वात कमी धावसंख्या आपल्या नावे नोंदवली.
याबरोबरच संपूर्ण २० षटके खेळून सर्वात कमी धावसंख्या बनवणाऱ्या संघांच्या यादीत राजस्थान दुसऱ्या स्थानी आले. या यादीमध्ये केकेआर प्रथम क्रमांकावर असून, त्यांनी मागील हंगामात आरसीबीविरूद्ध २० षटके खेळताना ८४ धावा केल्या होत्या. तसेच, कोणत्याही संघाकडून युएईमध्ये केलेली केलेली ही पाचवी सर्वात निचांकी धावसंख्या आहे.
मुंबईचा एकतर्फी विजय
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनी अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी करत राजस्थानच्या फलंदाजांना डोके वर काढू दिले नाही. नॅथन कुल्टर नाईल याने चार तर, हंगामातील आपला पहिला सामना खेळणाऱ्या जिमी निशाम याने तीन बळी मिळवून राजस्थानचा डाव अवघ्या ९० धावांवर रोखला.
राजस्थानने ठेवलेल्या ९१ धावांच्या आव्हानासमोर कर्णधार रोहित शर्माने १३ चेंडूत २२ धावा करून संघाला वेगवान सुरुवात दिली. दुसरा सलामीवीर ईशान किशनने २५ चेंडूत नाबाद अर्धशतकी खेळी करून संघाला ७० चेंडू राखून मोठा विजय मिळवून दिला. चार बळी घेणाऱ्या कुल्टर नाईल याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.