राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शनिवारी (२ ऑक्टोबर) सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने दमदार विजय नोंदवत प्लेऑफच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या सामन्याचा नायक ठरलेला अष्टपैलू शिवम दुबे याने नाबाद ६४ धावांची विजयी खेळी खेळली होती. सामन्यानंतर तो म्हणाला की फक्त त्यालाच नाही तर, संपूर्ण संघाला अशा डावाची नितांत गरज होती.
तो म्हणाला की ही खेळी पूर्णपणे माझ्या संघासाठी होती. सध्या आम्ही ६ व्या क्रमांकावर आहोत आणि आम्हाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे आवश्यक आहे. जर आम्ही पुढील दोन सामन्यांमध्ये खरोखर चांगले खेळलो, तर आम्ही प्लेऑफमध्ये पात्र ठरू शकतो. म्हणूनच ही खेळी आमच्यासाठी खूप महत्वाची होती.
यशस्वी जयस्वालचे अर्धशतक आणि दुबेच्या दमदार खेळीमुळे राजस्थानने ४७ व्या सामन्यात चेन्नईचा ७ गडी राखून पराभव केला आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या. मागील सामन्यांमध्ये तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नव्हता.
यावर दुबे म्हणाला की, हे सर्व संघ व्यवस्थापनावर अवलंबून असते. ह्या गोष्टी प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि कर्णधार यावर अवलंबून असतात. मी संधीची वाट पाहत होतो. मला संधी मिळाली आणि मी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. शिवम दुबे याने त्याचा मुंबईचा सहकारी जयस्वाल याचेही कौतुक केले.
तो पुढे म्हणाले की संघाला चांगली सुरुवात करून देणे आवश्यक असते. या सामन्यात यशस्वी आणि एविन लुईस यांनी चांगली फलंदाजी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. विशेषत: यशस्वीच्या फलंदाजीमुळे खूप फरक पडला. आम्हाला हवी ती सुरुवात मिळाली आणि आम्ही सामना सहज जिंकू शकलो.
या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने दमदार शतक झळकावले आणि निर्धारित २० षटकात १८९ धावा केल्या. प्रतिउत्तरादाखल, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांच्या अर्धशतकीय खेळींच्या जोरावर राजस्थाने ७ गडी आणि १५ चेंडू राखून चेन्नईने दिलेलं आव्हान पार केले.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ मध्ये षटकार मारत संघाला विजय मिळवून देणारे ६ क्रिकेटर
क्रिकेटपटूनंतर टेनिसपटूंची ऑस्ट्रेलियन सरकारवर टीका; ‘हे’ आहे कारण