भारत सरकारकडून प्रत्येकवर्षी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला जातो. क्रिडा क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. ४ वर्षांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. १९९१-९२ मध्ये या पुरस्काराला सुरुवात झाली. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हा पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू आहे.
७.५ लाख रुपये रोख बक्षीस, प्रमाणपत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्रातील ३ खेळाडूंना हा पुरस्कार मिळाला आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा –
१. सचिन तेंडुलकर –
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला १९९७-९८ चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. सचिन हा जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा आणि सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. एवढेच नाही तर तो १०० आंतरराष्ट्रीय शतके करणाराही सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू आहे.
मुंबईत रहाणाऱ्या सचिनने वयाच्या १६ व्या वर्षीत १९८९ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्याच्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत २०० कसोटी, ४६३ वनडे आणि १ टी२० सामना असे मिळून ६६४ सामने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळले आहेत. त्याने ६६४ सामन्यात ४८.५२ च्या सरासरीने ३४३५७ धावा केल्या आहेत.
२. अंजली भागवत – व्यावसायिक नेमबाज असलेल्या अंजली भागवतला २००२ ला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. याबरोबरच तिला २००२ मध्ये आयएसएसएफचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा नेमबाजी क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळाला होता. तसेच २००३ ला मध्ये तिने मिलान येथे पहिला विश्वचषकही जिंकला होता.
तीनं २००० ला सिडनीला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. तिने राष्ट्रकूल खेळात १२ सुवर्णपदके आणि ४ रौप्यपदके मिळवली आहेत. एवढेच नाही तर २००३ ला झालेल्या आफ्रो-एशियन गेम्समध्ये ३पी आणि एअर रायफल स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवणारी पहिली भारतीय नेमबाज ठरली होती.
३. धनराज पिल्ले – भारताचे दिग्गज हॉकीपटू धनराज पिल्ले यांना १९९९-०० चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. पिल्ले यांनी ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच ते ४ ऑलिम्पिकमध्ये खेळणारे एकमेव हॉकीपटू आहेत. ते १९९२, १९९६, २००० आणि २००४ अशा ४ ऑलिम्पिक स्पर्धेत खेळले आहेत.
तसेच त्यांनी ४ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा देखील खेळल्या आहेत. १९९०, १९९४, १९९८ आणि २००२ ला झालेल्या आशियाई गेम्समध्येही ते सामील होते. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९९८ ला आशियाई गेम्समध्ये आणि २००३ ला आफ्रो-एशियन स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. तसेच ते १९९८ च्या आशियाई गेम्समध्ये सर्वाधिक गोल्स करणारेही खेळाडू होते.
ट्रेंडिंग घडामोडी –
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू
आला पीचवर की पाठव तंबूत, फलंदाजांना भोपळाही फोडू न देणारे ३ भेदक गोलंदाज