भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. तो सध्या वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. क्रिकेटच्या इतिहासात रोहित शर्मा असा एकमेव फलंदाज आहे, ज्याने वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावली आहेत. परंतु असा कारनामा त्याला कसोटी क्रिकेटमध्ये करता आला नाही. अशातच माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू रमिज राजा यांनी रोहित शर्माचे कौतुक करत, तो कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यास अपयशी का ठरत आहे? याबाबत भाष्य केले आहे.
रोहित शर्माबद्दल भाष्य करताना रमिज राजा यांनी म्हटले की, “रोहित शर्मा सामना जिंकून देणारा खेळाडू आहे. तो माझा आवडता क्रिकेटपटू आहे. क्रिकेटमध्ये सध्या काही मोजके फलंदाज आहेत, ज्यांना खेळताना पाहण्यात आनंद होतो. डेवोन कॉनवेने नुकतेच द्विशतक ठोकले आहे. पण त्याची फलंदाजी फारशी सुंदर नव्हती. तर दुसरीकडे रोहित शर्माला खेळताना पाहणे मोहक असते. एकदा तो सेट झाला की तो मोठी खेळी खेळतो. त्याला फक्त नवीन चेंडूविरुद्ध खेळताना फुटवर्क सुधारण्याची आवश्यकता आहे. तसेच आपण इंग्लंडमध्ये जाऊन थेट चांगली कामगिरी करू शकत नाही. त्यामुळे त्याच्यासमोर अनेक आव्हान असतील.”
तसेच पुढे ते म्हणाले की, “रोहित शर्माने अजूनही कसोटी क्रिकेटचा कोड तोडला नाहीये. त्याच्याकडे असलेली प्रतिभा पाहून मी भविष्यवाणी केली होती की, तो एक महान कसोटी खेळाडू होईल. परंतु त्याला खेळपट्टीवर अधिक वेळ घालवावा लागणार आहे. महान खेळाडू परिस्थितीनुसार स्वत:ला जुळवून घेत असतात. रोहित शर्मालाही मैदानावर अधिक वेळ घालवायला आवडेल. जेव्हा आपण खेळपट्टीवर जास्त वेळ घालवू तेव्हा आपल्याला धावा करण्यात यश येईल. १९३० पासून हा नियम लागू आहे.”
आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. क्रिकेट चाहत्यांना, या मोठ्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. हा सामना १८ ते २२ जून दरम्यान साथउम्पटन येथे होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनी की विराट कोण आहे सर्वोत्तम कर्णधार? इंग्लंडच्या दिग्गजाने दिले ‘हे’ उत्तर
दीपक चाहरच्या ‘गजनी’ लूकने माहीच्या पत्नीलाही लावलं याड; म्हणाली, ‘एकदम खरतनाक’






