तिरंदाजी आणि हाॅकीनंतर आता रांचीच्या ग्रामीण भागात आजकाल क्रिकेटही खेळले जाऊ लागलेय. राज्याच्या राजधानीपासून केवळ २० किलोमीटर अंतरावर असलेल्या बाढू पंचायतच्या मुलींची भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याचप्रमाणे क्रिकेटचे मैदान गाजवण्याची इच्छा असून, यासाठीच या मुलींनी धोनीकडे क्रिकेट अकादमीची मागणी केली आहे. जेथे या युवा खेळाडू क्रिकेटचा सराव करू शकतील.
प्रतिभावंत महिला क्रिकेटपटू येत आहेत पुढे
हाॅकी आणि तिरंदाजीसाठी नेहमी चर्चेत असणाऱ्या झारखंडच्या मुलींना क्रिकेटमध्येही राज्याचे नाव मोठे करायचे आहे. झारखंडच्या कांको प्रदेशातील बाढू पंचायतच्या या मुली सकाळपासूनच क्रिकेटचा सराव करताना दिसतात. त्या स्वयंस्फूर्तीने क्रिकेट खेळत असतात. मात्र, आपल्याला योग्य प्रशिक्षणाची गरज असल्याचे या मुलींनी सांगितले.
मजेशीर गोष्ट तर ही आहे की, यांच्यातील अनेकांना नीट बॅट व बाॅलसुद्धा धरता येत नाही. असे असले तरी त्यांना भारतीय महिला क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंची नावे माहित आहेत. कोणाला मिताली राजची फलंदाजी तर, कोणाला झुलन गोस्वामीची गोलंदाजी आवडते.
न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार नौवाटोलीची राखी उरांवला फलंदाजी आवडते. तिला चौकार-षटकार मारायला आवडतात. मात्र, प्रशिक्षण मिळत नसल्यामुळे तिला फलंदाजीचे तंत्र माहीत नाही. ती म्हणाली, “हाॅकीप्रमाणे गावाच्या आसपास जर क्रिकेटसाठी प्रशिक्षण केद्र सुरू झाले तर माझ्यासारख्या अनेक खेळाडूंची क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्याचे स्वप्न पूर्ण होईल.”
राखीसोबत मैदानातील इशिका प्रिया आणि सुशीला गाडी यांना अनुक्रमे गोलंदाजी आणि फलंदाजी आवडते. सुशीला म्हणते की, मी खूप वेगात चेंडू फेकू शकते पण गोलंदाजीचे योग्य तंत्र माझ्याकडे नाही.
सरकार आणि धोनीकडून अपेक्षा
उपलब्ध असणाऱ्या मैदानात सराव करणाऱ्या या युवा खेळाडूंना राज्याच्या हेमंत सोरेन सरकारकडूनही अपेक्षा आहेत. हाॅकी व तिरंदाजीप्रमाणे त्यांच्या गावाजवळ क्रिकेटची अकादमी सुरू झाली तर त्या सहजासहजी हा खेळ तंत्रशुद्ध पद्धतीने समजू शकतील. या मुलींनी भारतीय संघाचा सर्वात यशस्वी क्रिकेट कर्णधार व रांचीचा राजकुमार या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एमएस धोनीकडे नवीन सुसज्ज क्रिकेट अकादमी बांधून देण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नको तेच झालं! इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघाचा डाव कोसळला अन् ‘तो’ नकोसा विक्रम झाला
“जो रूट कारकिर्दीतील सर्वोत्तम लयीत, पण आमच्या पाठिब्यांची नितांत गरज आहे”
आता मैदानाबाहेर वाकयुद्ध, एका विधानावरुन गावसकर अन् नासिरमध्ये जुंपली