---Advertisement---

‘पदार्पणवीर’ बिश्नोईने तर विक्रम केलेच, पण रोहितनेही ‘हे’ कारनामे करत पाकिस्तानी खेळाडूंना पछाडलं

Rohit-Sharma-and-Ravi-Bishnoi
---Advertisement---

कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज  (India vs West Indies) संघात बुधवारपासून (१६ फेब्रुवारी) ३ सामन्यांची टी२० मालिका कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर सुरू झाली. या टी२० मालिकेतील  (T20I Series) पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने ६ विकेट्सने विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. पहिल्या सामन्यातील भारताच्या विजयात पदार्पणवीर रवी बिश्नाई (Ravi Bishnoi) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. याबरोबरच त्यांनी या सामन्यांत खेळताना काही महत्त्वाचे विक्रमही केले. 

या सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून रवी बिश्नोईने ४ षटकांत १७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याने रोस्टन चेस आणि रॉवमेन पॉवेल यांना बाद केले. या सामन्यात वेस्ट इंडिजला २० षटकांत ७ बाद १५७ धावाच करता आल्या होत्या. त्यांच्याकडून निकोलस पूरनने ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली.

तसेच नंतर १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. त्याने ही खेळी १९ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने केली. भारताने १८.५ षटकांत १६२ धावा करत हा सामना ६ विकेट्सने जिंकला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार रवी बिश्नोईला देण्यात आला. या लेखात आपण रोहित आणि बिश्नोईने केलेल्या विक्रमांबद्दल जाणून घेऊ.

पदार्पणातच सामनावीर पुरस्कार
या सामन्यात भारताकडून दोन महत्त्वाच्या विकेट्स घेणाऱ्या बिश्नोईला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे हा त्याचा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता. त्यामुळे भारतासाठी पहिलाच टी२० सामना खेळताना पहिल्याच सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवणारा तो तिसरा फिरकी गोलंदाज बनला आहे. यापूर्वी प्रज्ञान ओझा आणि अक्षर पटेल यांनी असा कारनामा केला होता.

तसेच आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणात सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारा बिश्नोई तिसरा भारतीय फिरकी गोलंदाज आहे. या यादीत अव्वल दोन क्रमांकावर प्रज्ञान ओझा आणि अक्षर पटेल यांचीच नावे आहेत. प्रज्ञान ओझाने बांगलागेशविरुद्ध २१ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या, तर अक्षर पटेलने झिम्बाब्वे  विरुद्ध १७ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या.

रोहितच्याही नावावर मोठे विक्रम
रोहितसाठी बुधवारी झालेला सामना त्याच्या कारकिर्दीतील १२० वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता. त्यामुळे तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मोहम्मद हाफिजला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. हाफिजने ११९ सामने खेळले आहेत. या यादीत पाकिस्तानचा अष्टपैलू शोएब मलिक अव्वल क्रमांकावर आहे. त्याने १२४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.

याशिवाय रोहित वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वात जास्त टी२० धावा बनवणारा खेळाडूही बनला आहे. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला या बाबतीत मागे टाकले आहे. रोहितचे आता वेस्ट इंडिजविरुद्ध १६ टी२० सामन्यांत ४३ च्या सरासरीने ५५९ धावा झाल्या आहेत. तर, आझमच्या नावावर वेस्ट इंडिजविरुद्ध टी२०मध्ये ५४१ धावांची नोंद आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

सामना जिंकला, पण पोलार्डचे ते दोन शॉट पडले महागात; भारताचे ‘हे’ महत्त्वाचे खेळाडू जखमी

सनरायझर्स हैदराबाद मधून बाहेर पडताच डेविड वॉर्नरला या गोष्टीची येतेय आठवण, भावूक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय विजयाचे ‘३’ शिल्पकार,ज्यांनी वेस्ट इंडिजला पराभूत करण्यात बजावली मोलाची भूमिका

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---