कोलकाता। बुधवारी (१६ फेब्रुवारी) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात (India vs West Indies) टी२० मालिकेतील पहिला सामना (1st T20I) पार पडला. ईडन गार्डन्स, कोलकाता (Eden Gardens, Kolkata) येथे झालेल्या या सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. असे असले तरी, भारताला या सामन्यात दोन मोठे धक्के बसले. भारताचे दोन खेळाडू या सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाले.
पोलार्डच्या शॉटने दोन भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे वेस्ट इंडिज संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला. त्यांनी निकोलस पूरनच्या (६१) अर्धशतकाच्या आणि कर्णधार कायरन पोलार्ड याने (Kieron Pollard) अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या २४ धावांच्या जोरावर २० षटकांत १५७ धावा उभारल्या. मात्र या डावात वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आणि दीपक चाहर (Deepak Chahar) हे भारताचे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले. विशेष म्हणजे या दोन्ही खेळाडूंना पोलार्डच्याच शॉटमुळे दुखापत झाली.
झाले असे की, डावातील १७ व्या षटकात युजवेंद्र चहल गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या या षटकातील ५ व्या चेंडूवर पोलार्डने जोरदार शॉट खेळला. त्यामुळे चेंडू लाँगऑनच्या दिशेने गेला. त्यावेळी तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या वेंकटेश अय्यरच्या हाताला लागून चेंडू सीमापार गेला. पण, चेंडू हाताला लागल्याने अय्यरला दुखापत झाली. असे असले तरी अय्यर नंतर फलंदाजीसाठी आला होता आणि त्याने नाबाद २४ धावाही केल्या. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर असण्याची शक्यता कमी आहे.
मात्र, दीपक चाहरला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या पुढील सामन्यांतील खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याला १९ व्या षटकात दुखापत झाली. भुवनेश्वर कुमार गोलंदाजी करत असलेल्या या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पोलार्डने पुन्हा एकदा जोरदार शॉट खेळला. त्यावेळी क्षेत्ररक्षण करताना दीपक चाहरच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. तसेच त्याला फलंदाजीला येण्याची या सामन्यात गरज पडली नाही. मात्र, आता त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे पाहावे लागणार आहे.
भारताने जिंकला पहिला सामना
भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला २० षटकांत ७ बाद १५७ धावांवर रोखले होते. भारताकडून हर्षल पटेल आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने ४ विकेट्स गमावत १८.५ षटकात १५८ धावांचे आव्हान पूर्ण केले आणि सामना जिंकला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ४० धावा केल्या. तसेच इशान किशनने ३४ धावा केल्या. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवने ३४ आणि वेंकटेशन अय्यरने २४ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय विजयाचे ‘३’ शिल्पकार,ज्यांनी वेस्ट इंडिजला पराभूत करण्यात बजावली मोलाची भूमिका