इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगाम सुरू होण्यास आता आठवड्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. २६ मार्चपासून सुरू होणारा हा हंगाम वेगळा असणार आहे. कारण, या हंगामापासून स्पर्धेत १० संघ खेळताना दिसणार आहेत. तसेच या हंगामासाठी मेगा लिलाव झालेला असल्याने सर्वच संघ नव्याने बांधले गेले आहेत. अशात या हंगामाबद्दल अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी विविध मते मांडली आहेत. त्यातच आता माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी भविष्यातील कर्णधारपदासाठी मुल्यमापन करण्याची संधी असेल, असे मत व्यक्त केले आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘विराट कोहली आता कर्णधार नाही, पण रोहित शर्माची कामगिरी विशेषत: मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट राहिली आहे. भारत आता पाहिल की, भविष्यात संघाचे नेतृत्त्व कोण करेल. या शर्यतीत सध्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), रिषभ पंत (Rishabh Pant) आणि केएल राहुल (KL Rahul) आहे. भारतीय संघाला भविष्यासाठी एक मजबूत कर्णधाराचा शोध असेल आणि ही आत्ता एक संधी आहे.’
रवी शास्त्री पुढे म्हणाले, ‘मागील आयपीएलमध्ये आपण वेंकटेश अय्यरला पाहिले, त्याच्याबद्दल तोपर्यंत कोणी ऐकले नव्हते. पण स्पर्धा संपली आणि तो भारतीय संघात आला. त्यामुळे तुम्ही अनपेक्षित गोष्टींची अपेक्षा करत असता. हीच आयपीएलची सुंदरता आहे.’
याबरोबरच शास्त्रींनी हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीबद्दलही मत व्यक्त केले असून आगामी टी२० विश्वचषकासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असणार आहे, याबद्दलही प्रतिक्रिया दिली. हार्दिक पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यापासून गोलंदाजी करण्यासाठी संघर्ष करत आहे, ज्यामुळे त्याला भारतीय संघातील जागाही गमवावी लागली आहे. दरम्यान, त्याने तरी सध्या त्याच्या गोलंदाजीवर मौन साधले आहे. तो आयपीएल २०२२ हंगामात गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे.
शास्त्री म्हणाले, ‘मला वाटते की, भारतीय संघाची नजर बाकी कोणत्याही गोष्टीपेक्षा वेगवान गोलंदाजांवर अधिक असले. कारण आयपीएलनंतर ४ महिन्यांनी त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक खेळायचा आहे.’
शास्त्री करणार समालोचन
शास्त्री गेल्यावर्षी टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार झाले होते. त्यानंतर आता ते पुन्हा सात वर्षांनी समालोचन क्षेत्रात येत आहेत. शास्त्री आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) हिंदीमध्ये समालोचन करताना दिसणार आहेत.
मुंबई-पुण्यात आयपीएल सामने
आयपीएलमधील साखळी फेरीतील ७० सामने मुंबई आणि पुणे येथील ४ स्टेडियमवर होणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम या मैदानांवर सामने होणार आहेत, तर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम गहुंजे येथे सामने होणार आहेत.
आयपीएल २०२२ मधील पहिला सामना २६ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या गतविजेत्या आणि गतउपविजेत्या संघात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पुन्हा आयसीसी रँकिंगमध्ये ‘रॉकस्टार’ ठरला रवींद्र जडेजा; पण रोहितची ‘या’ स्थानावर घसरण
चर्चा धोनीच्या उत्तराधिकारीची; रैना म्हणतोय, ‘या’ चार खेळाडूंमध्ये आहे क्षमता