आयपीएल २०२२ची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि सर्व भारतीय खेळाडू आगामी टी२० विश्वचषकाला लक्षात घेऊन दमदार प्रदर्शन करत आहेत. प्रत्येकजण या टी२० लीगमध्ये आपली छाप सोडण्यासाठी प्रयत्नशील आहे, जेणेकरून त्यांना टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात जागा मिळवता येईल. या शर्यतीत युवा खेळाडूंबरोबर काही अनुभवी क्रिकेटपटूही आहेत. यातीलच एका नावाने सर्वाधिक प्रभावित केले आहे, ते नाव म्हणजे दिनेश कार्तिक. याच कार्तिकला भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पाठिंबा दिला आहे आणि तो धोनीनंतर तो संघासाठी फिनिशरची भूमिका बजावू शकतो.
कार्तिक (Dinesh Karthik) आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा भाग आहे. आतापर्यंत त्याने बेंगलोरकडून फिनिशरची भूमिका बजावली आहे. त्याने या हंगामात ३ सामने खेळताना २०४.५ च्या स्ट्राईक रेटने ४४ चेंडूंमध्ये ९० धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात त्याने १४ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात ७ चेंडूंमध्ये नाबाद १४ धावा आणि तिसऱ्या सामन्यात २३ चेंडूंमध्ये नाबाद ४४ धावा केल्या होत्या. या सर्व धावा त्याने सामन्याअंती केल्या आहेत.
कार्तिकविषयी बोलताना शास्त्री (Ravi Shastri) ईएसपीएन क्रिकइन्फोसोबत बोलताना म्हटले की, “सध्या जेवढे क्रिकेट खेळले जात आहे त्यामुळे खेळाडूंना दुखापत होण्याचे प्रमाण सामान्य आहे. असे असतानाही जर एखाद्याचा आयपीएल हंगाम चांगला राहिला असेल, तर त्या भारतीय खेळाडूंबाबत विचार करायला पाहिजे. कार्तिकच्या आयपीएल २०२२ अभियानाची सुरुवात शानदार राहिली आहे. जर त्याने असेच पूर्ण हंगामात धुमाकूळ घातला, तर तो नक्कीच टी२० विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) भारतीय संघात असेल.”
“त्याच्याजवळ अनुभवासह चांगले फटके खेळण्याची क्षमता आहे. सध्या संघात एमएस धोनी नसल्यामुळे संघाला फिनिशरची गरज आहे. परंतु अशावेळी तुम्हाला पाहावे लागेल की, संघात तुम्ही किती यष्टीरक्षकांना घेत आहात. कारण संघात आधीपासूनच ईशान किशन आणि रिषभ पंत आहेत आणि मग आता कार्तिकचीही भर पडेल. अशात जर या यष्टीरक्षकांपैकी एकाला दुखापत झाली, तर आपोआपच कार्तिकसाठी संघात जागा रिकामी होईल,” असेही शास्त्रींनी म्हटले आहे.