आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास थोडा कठीण राहिला आहे. पहिल्या २ सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाचे उपांत्य फेरीत जाणे कठीण दिसून येत होते. परंतु पुढील २ सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. रविवारी (७ नोव्हेंबर) अफगानिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या निकालावरून भारतीय संघाचे भवितव्य ठरणार आहे.
दरम्यान शुक्रवारी (५ नोव्हेंबर) स्कॉटलॅंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला होता. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने रवींद्र जडेजाला एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर जडेजाने भन्नाट उत्तर दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
स्कॉटलॅंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रवींद्र जडेजाने सर्वश्रेष्ठ कामगिरी केली होती. ज्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर तो प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पत्रकार परिषदेत आला होता. त्यावेळी पत्रकाराने त्याला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याबाबत प्रश्न विचारला होता. यावेळी त्याने भन्नाट प्रतिक्रीया दिली होती.
पत्रकाराने विचारले की, “अशी चर्चा सुरू आहे की, न्यूझीलंड संघ जर अफगानिस्तान संघाकडून पराभूत झाला तर भारतीय संघाला संधी मिळू शकते आणि जर न्यूझीलंड संघ पराभूत झालाच नाही तर काय कराल?” या प्रश्नाचे उत्तर देताना रविंद्र जडेजाने म्हटले की, “तर मग बॅग पॅक करणार आणि घरी जाणार.” जडेजाचे हे उत्तर ऐकून पत्रकार परिषदेत सर्वत्र हशा पिकला.
तसेच भारत विरुद्ध स्कॉटलॅंड यांच्यात झालेल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या स्कॉटलॅंड संघाकडून जॉर्ज मुंसीने सर्वाधिक २४ तर माईकल लिस्कने २१ धावांचे योगदान दिले होते. स्कॉटलॅंड संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ८५ धावांवर संपुष्टात आला होता. या धावांचा पाठलाग करताना केएल राहुलने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. तर रोहित शर्माने ३० धावांचे योगदान दिले होते. भारतीय संघाने हा सामना ८ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
तीन संघांचे भविष्य एका सामन्यावर ठरणार; जाणून घ्या अफगानिस्तान वि. न्यूझीलंड सामन्याबद्दल सर्वकाही






