इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या पाचव्या सामन्यात असे काही घडले की ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. या चुरशीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 10 धावांनी पराभव केला. एक वेळ केकआर संघ हा सामना सहज आपल्या खिशात घालणार असे वाटत असताना शेवटच्या पाच षटकांत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून पूर्णपणे खेळ पलटवला. तर आता आपण कोलकाता नाईट रायडर्सच्या लाजिरवाण्या पराभवाची काही प्रमुख कारणे जाणून घेऊया…
– केकेआरच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरला नितीश राणा. नितीश राणाला या चेन्नईच्या खेळपट्टीवरती चांगला सूर गवसला होता. तसेच त्याने अर्धशतकही ठोकले होते, पण सामन्याच्या 15 व्या षटकात तो राहुल चाहरच्या चेंडूवर जबरदस्तीने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात यष्टिचित झाला. या सामन्यात 47 चेंडूत 57 धावा करून तो तंबूत परतला. मैदानावर जम बसलेल्या या फलंदाजाला शेवटपर्यंत खेळण्याची गरज होती. पण राणाने छोटी चूक केली आणि लवकर आपली विकेट गमावली.
– त्यानंतर दुसरे कारण म्हणजे नितीश राणा बाद झाल्यानंतर केकेआरला 30 चेंडूत फक्त 31 धावांची गरज होती. परंतु सोळाव्या षटकातील दुसर्या चेंडूवर शाकिब अल हसनसारख्या अनुभवी फलंदाजाने अतिशय खराब फटका खेळून केकेआरला आणखी एक धक्का दिला. नितीश राणा दोन चेंडूंपूर्वी आऊट झाला असतानाही त्याने संधीची वाट न पाहता खराब फटका खेळून तंबूचा रस्ता धरला.
– तसेच केकेआरच्या पराभवाचे तिसरे मोठे कारण आंद्रे रसेल ठरला. आंद्रे रसेलला या चुरशीच्या सामन्यात एक नाही तर दोन-दोन संधी मिळाल्या. परंतु या संधीचे तो सोने करू शकला नाही. या सामन्यातील 16 व्या षटकात क्रुणालने टाकलेल्या चेंडूवर त्याने रसेलचा झेल सोडला. त्यानंतर जसप्रीत बुमराहनेही त्याचा आणखी एक झेल सोडला. परंतु देन जिवनदान मिळूनही तो याचा फायदा घेऊ शकला नाही आणि शेवटच्या षटकात बोल्टच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. या सामन्यात त्याने 15 चेंडूत केवळ 9 धावा केल्या.
– या सामन्यातील शेवटच्या 5 षटकांत केकेआरने 4 गडी गमावून केवळ 20 धावा केल्या. यामध्ये नितीश राणा, शाकिब अल हसन, आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स या दिग्गजांचा समावेश होता. शेवटच्या 30 चेंडूतच केकेआरचा संघ पिछाडीवरती पडला. अन्यथा सामान्यातील जवळजवळ 35 षटके त्यांनी मुंबई इंडियन्सवर वर्चस्व राखले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
अतिशय निराशादायी, माफी असावी; केकेआरच्या दारुण पराभवानंतर संघ मालकाने व्यक्त केली दिलगिरी
‘…म्हणूनच मुंबई इंडियन्सचे खेळाडू इतके प्रगतीशील आहेत,’ भारतीय दिग्गजाने केली रोहितची स्तुती