एक काळ असा होता की भारत आणि पाकिस्तानमध्ये नियमित क्रिकेट खेळले जात असे. दोन्ही देश एकमेकांच्या देशात क्रिकेट दौरे करायचे. आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे. शिवाय शारजाह, टोरंटो सारख्या ठिकाणी सामनेही खेळले जायचे. हे नव्वदच्या दशकात होत होते. पण आज परिस्थिती वेगळी आहे.
असे असले तरी जुने जाणते क्रिकेट चाहते व सध्याचे क्रिकेट प्रेमी आजही त्या आठवणीच्या पेटाऱ्यातील एक एक सामन्याचा खजाना उघडून मंत्रमुग्ध होतात. आजही ते सामने सहज डोळ्यासमोर उभे राहतात.
आज आपण अशाच एका आठवणीतील भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे सौरव गांगुली (Sourav Ganguly) फलंदाजीमध्ये फ्लॉप झाला, तरीही तो स्टार ठरला आणि सामन्याचा सामनावीर देखील तोच ठरला कसे…? तर साहजिकच आहे उत्तम गोलंदाजीच्या जोरावर.
कमी धावा असलेला सामना-
तारीख १७ सप्टेंबर १९९७, कॅनडामधील टोरोंटो सिटी (Toronto Cricket Club) येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या सहारा कपचा तिसरा सामना होता. भारताने पहिले दोन सामने जिंकले होते, त्यामुळे एवढं दडपण भारतीय संघावर नव्हतं. परंतु, पाकिस्तानी संघात तणावाचं वातावरण होतं. कारण हा सामना गमावण्याचा अर्थ म्हणजे मालिका गमावणे. मालिकेतील सगळे सामने गमावण्याला इंग्रंजीत भाषेत म्हणतात व्हाईटवॉश. या मालिकेत ५ सामने होते. त्यातील पहिले २ सामने भारत जिंकला होता. तिसरा सामना १६ सप्टेंबर रोजी होणार होता. परंतु तो अर्धवट अवस्थेत थांबविण्यात आला व १७ सप्टेंबर रोजी पुन्हा नव्याने तिसरा वनडे सामना झाला.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सबा करीम (Saba Karim) सलामीला आले. या बंगालच्या टायगर गांगुलीला २० चेंडूत फक्त २ धावा करता आल्या. त्याचबरोबर सचिन-द्रविडही अपयशी ठरले. शिवाय सचिन या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार होता. अझरुद्दीनने (M Azharuddin)६७ धावा केल्या आणि रॉबिन सिंगने (RR Singh ) ३२ धावांचे योगदान दिले. त्यामुळे निदान भारत १८२ धावांवर पोहोचू शकला.
फलंदाजीत फ्लॉप पण गोलंदाजीत मात्र चमकला-
हा एक काळ होता जेव्हा एकदिवसीय सामन्यात २००-२२० धावसंख्या देखील खूप मोठी मानली जायची. जर त्यापेक्षा कमी धावसंख्या असेल प्रतिस्पर्धी संघाचा तर विजय निश्चित मानला जात असे आणि भारताने फक्त १८२ धावा केल्या होत्या. पाकिस्तानला एक चांगली संधी होती. पण गांगुली त्यांच्या विजयाच्या आड आला. त्यामुळे पाकिस्तान संघ हा सामना जिंकता जिंकता हरला.
सामन्यात एक वेळ अशी होती जेव्हा पाकिस्तान मजबूत स्थितीत होता. १८ षटकांचा खेळ पूर्ण झाला होता आणि पाकिस्तानने फक्त ३ गडी गमावून १०३ धावा केल्या होत्या. १९० चेंडू शिल्लक आणि धावा करायच्या होत्या फक्त ९०. परंतु, सौरव “दादाने” अशी गोलंदाजी केली की पाकिस्तान संघाला फक्त ४५ धावाच करता आल्या.
त्यादिवशी गांगुलीने चेंडूने आपला करिष्मा दाखविला. उर्वरित ७ बळींपैकी ५ बळी एकट्या गांगुलीने घेतले. त्यातील चार दिग्गज फलंदाज होते – इजाज अहमद (Ijaz Ahmed), सलीम मलिक(Saleem Malik), हसन रझा (Hasan Raza), मोईन खान (Moin Khan). गांगुलीच्या माऱ्यापुढे पाकिस्तानी संघाला सावरता आलं नाही. अवघ्या ४५ धावांमध्ये ७ गडी गमावून १४८ धावांवर संपूर्ण पाकिस्तानी संघ बाद झाला.
त्या सामन्यात गांगुलीने संपूर्ण १० षटके फेकली. त्या सामन्यात गांगुली असा एकमेव भारतीय गोलंदाज होता ज्याने आपला गोलंदाजीचा कोटा पूर्ण केला. या १० षटकांत त्याने ३ निर्धाव षटक टाकत फक्त १६ धावा दिल्या. सौरव गांगुलीच्या एकदिवसीय गोलंदाजी कारकिर्दीतील ही सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. पाकिस्तानने ३४ धावांनी हा सामना गमावला आणि मालिकाही गमावली.
दादाची “दादागिरी”-
त्या सामन्यात सौरव गांगुलीला सामनावीर पुरस्कार मिळाला हे सांगण्याची गरज नाही. त्या मालिकेत गांगुली भयानक फॉर्मात होता. ‘मालिकावीर’ देखील तोच ठरला. फलंदाजी आणि गोलंदाजीने दोन्ही क्षेत्रात चमकदार कामगिरी केले. दादाने पाच सामन्यांत २२२ धावा आणि १५ बळी घेतले होते. तो उत्कृष्ठ खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी राहिला. ही एक त्याची उत्तम कामगिरी होती, तेही पाकिस्तानविरूद्ध.
वेळ गेली गांगुलीही निवृत्त झाला. पण आजही गांगुलीच्या दोन गोष्टी क्रिकेटप्रेमींच्या नजरेत तशाच आहेत. एक म्हणजे गांगुलीने फिरकी गोलंदाजाच्या चेंडूवर क्रीझमधून बाहेर येऊन लॉन्ग ऑफच्या दिशेने मारलेला अप्रतिम षटकार आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोलंदाजी करताना अगदी छोटासा रनअप, चेंडू छातीला धरलेला आणि त्याची धावण्याची पद्धत.
वाचनीय लेख –
…आणि सचिन १९४वर असताना द्रविडने डाव घोषित केला आणि झाला लाखो भारतीयांच्या नजरेत व्हिलन!
किस्से क्रिकेटचे १३- भारत इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवत होता, कर्णधार मात्र आराम खुर्चीत…