२९ मार्च २००४ हा भारतीय क्रिकेटमधील महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. विरेंद्र सेहवाग कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकणारा पहिला खेळाडू बनला. जिथे सेहवागने ३७५ चेंडूत ३०९ धावा कुटल्या तर सचिन तेंडुलकरने त्याच पिचवर ३४८ चेंडूवर नाबाद १९४ धावा काढल्या. पण त्याचदिवशी भारताचा काळजीवाहू कर्णधार राहुल द्रविडने सचिन तेंडुलकर १९४ धावांवर खेळत असताना डाव घोषित करण्याचा विवादास्पद निर्णय घेतला. या घटनेच्या १६ वर्ष झाल्यानंतरही या घटनेवरील प्रश्न कमी झाले नाहीत.
कारगिल युद्धानंतर पाकिस्तानच्या निमंत्रणावरून प्रथमच भारतीय संघ पाच वनडे आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानात रवाना झाला. विरूद्ध संघाचे असले तरी भारतीय खेळाडूंची पाकिस्तानमध्ये देखील भरपूर क्रेझ होती. वनडे मालिकेने दौऱ्याचा शुभारंभ होणार होता. ३-२च्या फरकाने भारताने मालिका जिंकली होती. आता नंबर होता कसोटी मालिकेचा.
पहिली कसोटी मुलतानच्या मैदानावर होणार होती. पण, सुरूवातीलाच माशी शिंकली. कर्णधार सौरव गांगुलीच्या पाठीच्या दुखण्याने डोके वर काढले. कमीत कमी १५ दिवसांच्या विश्रांतीची गरज आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आणि कर्णधारपदाची जबाबदारी राहुल द्रविडच्या खांद्यावर आली.
२८ मार्चला सकाळच्या आल्हाददायक वातावरणात राहुल द्रविड आणि इंजमाम उल हक नाणेफेकीसाठी आले. द्रविडने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मुलतानची खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन होती. त्यावेळी क्रिकेटचे वातावरणच वेगळे होते. भारत व पाकिस्तान देशांसह जगाचे लक्ष या देशांतील सामन्यांकडे लागले असायचे. त्यात आतासारखं ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा इंटरनेटचं जाळ नसल्याने टीव्ही किंवा रेडिओ हेच दोन पर्याय. अगदी तिसरा पर्याय म्हटलं तर दुसऱ्या दिवशी येणारं वृत्तपत्र. तरीही वातावरण निर्मिती मात्र जोरात असायची.
तर या सामन्यात भारताकडून सलामीला दिल्लीकर विरेंद्र सेहवाग अन घरेलू क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घालणारा आकाश चोप्रा उतरले. पहिल्या सत्रात एकही बळी जाऊ न देता दोघांनी पूर्ण सत्र खेळून काढले. दोघेही परस्परविरोधी शैलीचे फलंदाज आपआपला नैसर्गिक खेळ खेळत होते. मुलतानच्या रणरणत्या उन्हात सेहवाग चौकारांनी तर चोप्रा आपल्या बचावाने पाकिस्तानच्या गोलंदाजांची परिक्षा घेतली. सेहवागने फक्त १०७ चेंडूत शतक झळकावत दौर्याची शानदार सुरुवात केली. संघाची धावसंख्या १६० झाली असताना सकलेन मुश्ताकने आकाश चोप्राला वैयक्तिक ४२ धावांवर बाद केले. पाठोपाठ कर्णधार राहुल द्रविड मोहमद सामीच्या शिकार झाला.
आता बेधडक खेळत असलेल्या सेहवागच्या साथीला सचिन तेंडुलकर आला. सचिनने सेहवागला नायकाची भूमिका करू देत हवे तसे खेळू दिले. बघता बघता सेहवागने द्विशतक पार केले. सचिननेदेखील चाहत्यांच्या आणि संघाच्या अपेक्षांवर खरे उतरून शतक साजरे केले. सेहवाग थांबायचे नाव घेत नव्हता. सकलेन मुश्ताकला लाँग ऑनला षटकार ठोकत त्रिशतक पूर्ण करून त्रिशतक झळकवणारा पहिला भारतीय होण्याची कामगिरी त्याने केली. त्रिशतकानंतर सेहवाग जास्त काळ टिकला नाही आणि ३०९ धावांची विक्रमी खेळी करून परतला.
सचिनने लक्ष्मणसोबत ५६ धावांची भागीदारी करत आपले दिडशतक पूर्ण केले. युवा युवराज सिंग मैदानावर उतरला होता. चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा सचिन १६५* तर युवराज ११* धावावर खेळत होते. सचिनला त्याचे द्विशतक पूर्ण करण्यासाठी १५ षटके मिळणार होती कारण थकलेल्या पाकिस्तानी खेळाडूंना दिवसाच्या अखेरीस फलंदाजी करायला लावून काही विकेट घेण्याची कर्णधार द्रविड व प्रशिक्षक जॉन राईट यांची योजना होती.
चहापानानंतर दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्राचा, खेळ सुरू झाल्यावर युवराजने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. ताबडतोब फटके खेळत त्याने अर्धशतक बनविले. सचिनने देखील ३५ चेंडूत २९ धावा ठोकल्या होत्या. ड्रिंक्स ब्रेकच्या एक षटक आधी बारावा खेळाडू रमेश पोवार काहीतरी संदेश घेऊन आला. त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर इम्रान फरहातने युवराजला बाद केले आणि भारतीय कर्णधार राहुल द्रविडने डाव घोषित केला. सचिन काहीवेळ चकीत झाला अन खाली मान घालून हताश होवून पॅव्हेलियनकडे चालू लागला. भारताची धावसंख्या ६७५-५ (घोषित) अशी दिसत होती.
दुसऱ्या दिवशी राहिलेल्या षटकांत भारताला बळी मिळाला नाही तरीही भारताने पाकिस्तानला ४०७ धावांवर सर्वबाद करत फॉलोऑन देत दुसरा डावही पाचव्या दिवशी २१६ धावांत गुंडाळत एक डाव आणि ५२ धावांनी विजय मिळवला. पुढे मालिका देखील २-१ ने खिशात घालत पाकिस्तानच्या भूमीवर पहिला कसोटी मालिका विजय मिळवला.
सचिन डाव घोषित करण्याच्या निर्णयावर निराश दिसला. त्याच्यामते, “मी आणि युवराज खेळत असताना, रमेश पोवार संदेश घेऊन आला की, हे षटक आपल्या डावाचे अखेरचे षटक आहे यानंतर डाव घोषित होईल. दुर्दैवाने फरहातच्या षटकातील पहिल्या चार चेंडूवर युवराज धाव घेऊ शकला नाही आणि पाचव्या चेंडूवर बाद झाला. गांगुली आणि जॉन (कोच जॉन राइट) कडून मला अशी माहिती मिळाली की तो सर्वस्वी द्रविडचा निर्णय होता.”
द्रविड या विवादित घटनेविषयी सांगतो की, ” हा निर्णय संघहित म्हणून घेतला गेला होता. आधी ठरल्याप्रमाणे शेवटचा एक तास पाकिस्तानला खेळण्यासाठी देण्याचे ठरले होते. सचिनच्या वैयक्तिक विक्रमापेक्षा संघहित महत्वाचे होते. ”
जॉन राईट आपल्या ‘इंडीयन समर’ या पुस्तकात या घटनेचा उल्लेख करताना लिहतात,
” त्या घटनेनंतर काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. मी द्रविडला चहापानाच्यावेळीच डाव घोषित करण्याची कल्पना सांगितली होती पण त्याने पाकिस्तानला फक्त एक तास फलंदाजी देण्याचे पक्के केले होते म्हणून डाव अजून पंधरा षटक पुढे सुरू राहिला. मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे की, या महान खेळाडूंनी हा मुद्दा लवकरात लवकर चर्चेद्वारे मिटवला.”
सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचा समावेश हा भारताच्या सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये होतो. त्यांनी तो मुद्दा तेव्हाच निकाली काढला परंतु चाहते व मीडियामध्ये तो मुद्दा आजही चर्चिला जातो.
मनोरंजक लेख- ते ३ झेल, ज्यामुळे खऱ्या अर्थाने बदलला भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा
क्रिकेटचा खास किस्सा- कॅप्टन पत्रकार परिषदेत व्यस्त असताना टीम इंडियाच्या ‘हा’ पठ्ठ्याने पटापट संपवली होती शॅम्पेन…!!!