आयसीसी टी२० विश्वचषकात भारतीय संघाला यावर्षी निराशा मिळाली आहे. भारतीय संघ यावर्षीच्या टी२० विश्वचषकाच्या गट फेरीतूनच बाहेर फेकला गेला. विश्वचषकाच्या सुरवातीच्या दोन सामन्यात भारताने निराशाजनक प्रदर्शन केले आणि दोन्ही सामन्यात पराभव पत्करला. त्यानंतरच्या तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात संघाने विजय मिळवला असला, तरी त्याचा फायदा होऊ शकला नाही. आता सोमवारी भारतीय संघ त्याचा चौथा सामना नामिबियाविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी दिग्गज क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने त्याचे म्हणणे मांडले आहे.
भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीसाठी हा कर्णधाराच्या रूपातील शेवटचा टी२० सामना असणार आहे. विराटने यापूर्वीच टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे, अशी घोषणा केली होते. त्याव्यतिरिक्त भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींसाठी देखील हा संघासोबतचा शेवटचा सामना असणार आहे. शास्त्री यांचा संघासोबतचा कार्यकाळ टी२० विश्वचषकानंतर संपणार आहे. शास्त्रींनंतर मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी राहुल द्रविड स्वीकारणार आहेत.
टी२० विश्वचषक २००७ च्या विजेत्या भारतीय संघाचा भाग असलेल्या रॉबिन उथप्पाने त्याच्या कू ऍपवरील अधिकृत खात्यावरून त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने या पोस्टममध्ये लिहिले आहे की, “हे निराशाजनक आहे की, भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही, पण हे म्हणणेही योग्य आहे की, दोन चांगल्या संघांनी या गट फेरीतून बाद फेरीत प्रवेश केला. हा कोहली-शास्त्री युगाचा शेवटचा सामना आहे, तर संघ या निराशाजनक स्पर्धेचा शेवट एका चांगल्या विजयाने करू इच्छित असेल.”
दरम्यान, गट दोनमध्ये उपांत्य सामन्यात पहिल्यांदा पाकिस्तानने स्थान मिळवले. त्यानंतर उपांत्य सामन्यात पोहोचणारा दुसरा संघ न्यूझीलंड ठरला. भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. यामध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडने पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाचा पराभव केला. त्यानंतर अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडला तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात भारतने पराभूत केले. अशात टी२० विश्वचषकाचा शेवट विजयाने करण्याचा संघाचा प्रयत्न असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
जाता-जाता शास्त्री गुरूजींनी फोडला बॉम्ब! म्हणाले, “आयपीएलमूळे विश्वचषकात…”
‘भारतीय संघ चांगल्या हाती आहे’, म्हणत विराटने दिले पुढील भारतीय टी२० कर्णधाराबाबत संकेत