भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला यावर्षीचा क्रीडाक्षेत्रातील सर्वात मोठा मानला जाणारा पुरस्कार म्हणजेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. त्याच्यासह कुस्तीपटू विनेश फोगट, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, पॅरा ऍथलिट मरियप्पन थंगवेलू आणि टेबल टेनिसपटू मनिका बात्रा यांनाही हा पुरस्कार मिळणार आहे.
यावेळी बीसीसीआयने रोहित शर्माची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली होती. आता क्रीडा मंत्रालयाने त्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
रोहितने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने २०१९ हे वर्ष गाजवले होते. त्याने मागील वर्षी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यात त्याने २८ सामने खेळताना ५७.३० च्या सरासरीने १४९० धावा केल्या आहेत. त्यात ६ अर्धशतके आणि ७ शतकांचा समावेश आहे. ही कामगिरी एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपेक्षा सर्वोच्च आहे.
त्याने मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या वनडे विश्वचषकात अभूतपूर्व कामगिरी केली आहे. त्यादरम्यान त्याने ९ सामने खेळताना ८१ च्या सरासरीने ६४८ धावा केल्या होत्या. त्यात त्याने सर्वाधिक ५ शतके ठोकली होती. या वर्षाच्या सुरुवातीला त्याला आयसीसीचा ‘वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून गौरविण्यात आले होते.
त्याचबरोबर रोहित हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा केवळ चौथाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर (१९९७-९८), एमएस धोनी(२००७) आणि विराट कोहली(२०१८) यांना खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे.
रोहित बरोबरच खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणाऱ्या विनेश फोगटने २०१८ च्या राष्ट्रकूल स्पर्धेत आणि एशिया गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले आहे आणि २०१९ च्या जागतिक कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
तसेच भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघ टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. तसेच ती हा पुरस्कार मिळवणारी पहिली महिला हॉकीपटू ठरली आहे. तसेच एकूण तिसरी हॉकीपटू आहे. तिच्याआधी धनराज पिल्ले(२०००) आणि सरदार सिंग(२०१७) या हॉकीपटूंना हा पुरस्कार मिळाला आहे.
याबरोबरच थंगवेलूने २०१६ च्या ऑलिम्पिकमध्ये टी४२ हाय जंपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तर मनिका बात्राने २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण तर एशियन गेम्समध्ये कांस्यपदक मिळवले होते.
याशिवाय २७ खेळाडूंची अर्जून पुरस्कारासाठी निवड झाली आहे.