इंडियन प्रीमियर लीग २०२२ ही २६ मार्चपासून सुरू होणार आहे. या हंगामात १० संघ खेळताना दिसणार आहेत. या लीगचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघाचा कर्णधार रोहित शर्माने ही लीग सुरू होण्यापूर्वी आपले मत मांडले आहे. मुंबईच्या दोन मैदानात सामने खेळण्याचा जास्त काही फायदा मुंबई इंडियन्स संघाला होणार नाही, असे मत मुंबईच्या कर्णधाराने मांडले आहे. रोहितने सांगितले की, नव्या संघात असे खेळाडू आहेत, ज्यांनी मागील २ वर्षांत मुंबईमध्ये खेळलेच नाहीत.
भारतीय कर्णधाराने पत्रकार परिषदेत सांगितले की, “मला आशा आहे की, तुम्ही आयपीएलचा मेगा लिलाव पाहिला असेल. हा अपेक्षित नवा संघ आहे. संघांमध्ये अनेक नवे खेळाडू सहभागी झाले आहेत, त्यामुळे मला तरी असे वाटत नाही की मुंबईमध्ये होणाऱ्या सामन्यांचा संघाला काही फायदा होईल. संघातील ७० ते ८० टक्के खेळाडू या अगोदर मुंबईमध्ये खेळले नाहीत. त्यामुळे जास्त फायदा होऊ शकत नाही. आयपीएलचे सर्व लीग सामने पुणे आणि मुंबईमध्ये पार पडणार आहेत.”
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) २००८ मधील आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांनंतर वानखेडेमध्ये खेळताना दिसणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) बुधवारी (२३ मार्च) या पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाला, “फक्त मी, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, ईशान किशन आणि जसप्रीत बुमराह एवढ्याच खेळाडूंनी मुंबईमध्ये खूप सामने खेळले आहेत. इतर खेळाडूंना मुंबईच्या मैदानात एवढे सामने खेळले नाहीत, त्यामुळे अतिरिक्त फायदा होईलच असे नाही.”
रोहित पुढे म्हणाला की, “आम्ही सर्वजण २ वर्षांनंतर मुंबईमध्ये खेळत आहोत. आम्ही मुंबईमध्ये एकही सामना खेळलेला नाही. इतर संघ मागील हंगामात मुंबईमध्ये खेळले होते परंतु आम्हाला मुंबईत एकही सामना खेळता आला नाही. त्यामुळे जास्त काही फायदा होणार नाही.”
मुंबई संघाने आयपीएलमध्ये ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे, अशी कामगिरी करणारा मुंबई हा एकमेव संघ आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जड्डूचा ‘सर’ जडेजा करण्यात माही भाईचाच आहे सिंहाचा वाटा; बोटाला धरून शिकवलंय
चॅम्पियन ‘थाला’ | आयपीएलमध्ये धोनी म्हणजे कॅरम खेळताना नेहमी राणीचा विचार करणारा ‘मामू’