भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १७ नोव्हेंबरपासून टी२० मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका भारतीय संघासाठी खास असणार आहे, यामध्ये संघाला रोहित शर्माच्या रूपात नवीन नियमित टी२० कर्णधार आणि राहुल द्रविडच्या रूपात नवीन मुख्य प्रशिक्षक मिळाले आहेत. मालिकेतील पहिला सामना खेळण्यापूर्वी या दोघांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीची टी२० संघातील फलंदाजाच्या भूमिकेविषयी मत व्यक्त केले आहे.
विराट कोहलीने यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे टी२० विश्वचषकानंतर भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे आणि त्याच्या जागेवर रोहित शर्मा आता ही जबाबदार पार पाडणार आहे. तसेच आता न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेदरम्यान विराटला विश्रांती दिली गेली आहे. विराट आता न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात खेळताना दिसेल.
रोहितला यावेळी प्रश्न विचारला गेला की, विराट कोहलीची भारतीय टी२० संघात फलंदाजाच्या रूपात काय भूमिका असेल? यावर उत्तर देताना रोहित म्हणाला की, विराट कोहली जे आतापर्यंत करत आला आहे, पुढेही तिच भूमिका असेल. संघाच्या दृष्टीने तो खूप मोठा खेळाडू आहे आणि प्रत्येक खेळाडूची भूमिका महत्वाची असते. विराट जेव्हा कधी संघात परत येईल, तेव्हा तो आम्हाला फायदाच करून देईल.
टी२० विश्वचषकानंतर रवी शास्त्रींचा संघासोबतचा करार संपला आणि राहुल द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. रोहित आणि द्रविड यांनी मंगळवारी (१६ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत संघाच्या आगामी काळातील नियोजनाविषयी माहिती दिली आहे.
द्रविड यावेळी म्हणाले की, कामाच्या ताणाविषयी व्यावस्थापन करणे, आता क्रिकेटचा भाग बनले आहे, त्यामुळे आपल्याला स्वतःच या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. मग ते संघात राहून कोणाला विश्रांती देणे असो किंवा सुट्टी देणे असो. आव्हान फक्त आपल्यासाठी नाहीय, तर सर्व देशांसाठी आहे, कारण न्यूझीलंडनेही केन विलियम्सनला टी२० मालिकेतून विश्रांती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘वडिलांचे स्वप्न पूर्ण करतोय’ म्हणत सचिन तेंडूलकरने उचलला ६५० गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च