भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने मुंबई संघासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणार नाही असे पूर्णपणे मनाशी ठरवले होते. त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएकडून एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) देखील मागितले होते. एमसीएने त्याला एनओसी देखील प्रदान केले होते, परंतु एक व्यक्ती आहे ज्याने यशस्वी जयस्वालला फक्त मुंबईकडून खेळण्यास राजी केले. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहित शर्माच्या आग्रहामुळेच यशस्वी जयस्वाल मुंबईकडून खेळत राहू इच्छितो.
मुंबई मिररमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मानेच यशस्वी जयस्वालला मुंबई संघात रोखले. अहवालात एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणतात, “रोहित शर्माने यशस्वी जयस्वालला त्याच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर मुंबई संघासोबत राहण्यास सांगितले. त्याने स्पष्ट केले की मुंबईसाठी खेळणे ही खूप सन्मानाची गोष्ट आहे, कारण या संघाने 42 रणजी जेतेपदे जिंकली आहेत. रोहितने यशस्वीला असेही सांगितले की मुंबईने तुला व्यासपीठ दिले आहे हे विसरू नका, त्यानंतर तु इतक्या लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमवत आहेस. रोहितने यशस्वीला मुंबई शहर विसरू नको असेही सांगितले, कारण तु येथील मैदानांवर वयोगटातील क्रिकेट खेळला आहे.”
अजिंक्य नाईक पुढे म्हणाले, “यशस्वी जयस्वालने रोहित शर्मा आणि भारत आणि मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर दिग्गजांशी याबद्दल चर्चा केली. त्यानंतर, त्याने एमसीएला एनओसी मागे घेण्यासाठी ईमेल केला आणि आम्ही त्याची विनंती स्वीकारली आहे.” जयस्वालने एप्रिल महिन्यात एमसीएकडून एनओसी मागितली होती. जयस्वालच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्य वाटले की त्याला गोव्यात का जायचे आहे? तथापि, पुढच्याच महिन्यात त्याने एमसीएला त्याचे एनओसी मागे घेण्याची विनंती केली आणि आता तो पुन्हा मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास तयार आहे.






