भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेली विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) सध्या विविध शहरांमध्ये खेळवली जात आहे. या स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधत आहेत. संपूर्ण वर्षभरात सर्वाधिक चर्चेत राहिलेला महाराष्ट्राचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने या स्पर्धेतही आपला दबदबा कायम राखला आहे. पाच सामन्यातील आपले चौथे शतक साजरे करत त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली.
राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या एलिट ग्रुप डी मधील पाचव्या फेरीचा सामना महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड असा खेळला गेला. छत्तीसगडने दिलेल्या ३१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराजने १३२ चेंडूमध्ये १२ चौकार व ६ षटकार ठोकत १६८ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. पाच सामन्यातील त्याचे हे चौथे शतक आहे. त्यापूर्वी त्याने या स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यात शतक झळकावले होते. (Ruturaj Gaikwad Four Hundreds)
या शतकासोबतच ऋतुराजच्या नावे अनेक नवे विक्रम जमा झाले आहेत. स्पर्धेच्या एकाच हंगामात चार शतके करणारा तो चौथा फलंदाज बनला. यापूर्वी अशी कामगिरी सर्वप्रथम विराट कोहली याने दिल्लीसाठी खेळताना २००८-२००९ मध्ये केली होती. त्यानंतर, मागील वर्षी कर्नाटकचा देवदत्त पडीक्कल (Devdutt Padikkal) व मुंबईचा पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांनी एकाच हंगामात चार शतके झळकावली होती. चालू हंगामात अशी कामगिरी करणारा ऋतुराज एकमेव फलंदाज आहे.
या शतकासह ऋतुराज विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याच्या नावे आता आठ शतके जमा झाली आहेत. या यादीमध्ये कर्नाटकचा अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पा ११ शतकांसह अव्वलस्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावरील यशपाल सिंग यांच्या नावे १० शतके आहेत. तमिळनाडूचा अभिनव मुकुंद व महाराष्ट्राचा अंकित बावणे हे प्रत्येकी ९ शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
राष्ट्रीय वुशू स्पर्धेत पुण्याच्या श्रावणी कटकेला एक रौप्य व दोन कांस्य
कोणामुळे रोहित झाला गंभीर दुखापतग्रस्त? ५ वर्षांपूर्वी देखील झाली होती घटना
ते परत आलेत! भारतीय क्रिकेटचे शिवधनुष्य पेलतेय ‘बॅच ऑफ १९९६’