---Advertisement---

‘ऋतुराज महाराष्ट्रीयन संजू सॅमसन’, कसोटी संघात निवड न झाल्याने चाहत्यांची बीसीसीआयवर टीका

On: सोमवार, सप्टेंबर 9, 2024 4:55 PM
---Advertisement---

अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने रविवारी (08सप्टेंबर) बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. भारताच्या कसोटी संघात यष्टीरक्षक रिषभ पंतचे पुनरागमन झाले आहे. तर यश दयालला या संघात प्रथमच स्थान मिळाले आहे. तरुण गोलंदाज आकाशदीपही संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार व युवा सलामीवीर रुतुराज गायकवाड संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. यावरुन क्रिकेटचाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रुतुराज सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये भारत क संघाचे नेतृत्व करत आहे. भारत ड विरुद्धच्या सामन्यात त्याने छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी खेळली. सामन्याच्या दुसऱ्या डावात रुतुराजने 48 चेंडूंचा सामना करत 46 धावा केल्या. त्याच्या खेळीत आठ चौकारांचा समावेश होता. त्याच्या खेळीने भारत ड विरुद्ध भारत क संघाच्या विजयाचा पाया रचला.

याव्यतिरिक्त रुतुराजची प्रथम श्रेणी क्रिकेटची आकडेवारीही चांगली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 42.69  आहे. त्याने भारतासाठी टी20 आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे, परंतु अद्याप त्याला कसोटीत संधी मिळालेली नाही. रुतुराज सलामीवीर असून त्याच्यासाठी भारताच्या कसोटी संघात सध्या जागा रिक्त नाही. कसोटी संघात रोहित शर्मासोबत यशस्वी जयस्वाल सलामीची जबाबदारी पार पाडत आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल आहे, जो सलामीसाठी बॅकअप आहे.

रोहित कर्णधार असून तो फॉर्मात आहे. जयस्वालने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 700हून अधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याची जागाही निश्चित झाली आहे. अशा स्थितीत रुतुराजसाठी कसोटी संघात जागा रिक्त नसल्याने निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले असावे.

मात्र रुतुराजला कसोटी संघात संधी न मिळाल्याने चाहते संतापले आहेत. रुतुराजची निवड न केल्याने चाहत्यांनी निवड समितीला फैलावर घेतले आहे. गायकवाड हा महाराष्ट्राचा संजू सॅमसन असल्याचे काही चाहत्यांचे म्हणणे आहे. संजूलाही भारतीय संघामध्ये सातत्यपूर्ण संधी मिळत नाहीत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे रुतुराजची तुलना संजूशी करण्यात आली आहे. काही चाहत्यांनी निवड समिती रुतुराजसोबत राजकारण करत असल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---