भारत अ आणि दक्षिण अफ्रिका अ संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या चारदिवसीय सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. कमी सूर्यप्रकाशामुळे हा खेळ लवकर थांबवला गेला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने त्यांच्या पहिल्या डावात ४ विकेट्सच्या नुकसानावर ३०८ धावा केल्या आहेत. खराब सूर्यप्रकाशामुळे खेळ थाबवला गेला, तेव्हा भारताचे बाबा अपाराजित (१९) आणि उपेंद्र यादव (५) खळपट्टीवर खेळत होते. सध्या भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेपेक्षा २०१ धावांनी पिछाडीवर आहे.
भारताने तिसऱ्या दिवसाची सुरुवात एक बाद १२५ धावांपासून केली. तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन केले. कर्णधार प्रियांक पांचाल आणि अभिमन्यू ईश्वरन या दोघांनी केलेल्या महत्वाच्या भागिदारीमुळे संघाची धावसंख्य २०० धावांच्या पुढे गेली. प्रियांक पांचालने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. पण तो शतक करण्यापासून अवघ्या काही अंतरावर असताना बाद झाला. त्याने ९६ धावांची महत्वाची खेळी केली.
पांचालसोबत अभिमन्यू ईश्वरनने महत्वाची भागीदारी केली आणि स्वतःचे शतक पूर्ण केली. पांचाल बाद झाल्यानंतर हनुमा विहारीने सुरुवातील ईश्वरनची चांगली साथ दिली. पण तो जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. विहारी २५ धावा करून तंबूत परतला. यादरम्यान ईश्वरनने त्याचे शतक पूर्ण केले, मात्र तो शतक पूर्ण करून लगेच बाद झाला. त्याने एकूण १०३ धावांची महत्वाची खेळी केली. यानंतर बाब अपराजित आणि उपेंद्र यादवने संघाचा डाव सांभाळला होता. परंतु, कमी सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. अपराजित १९ आणि यादव ५ धावांसह खेळपट्टीवर कायम आहेत. दक्षिण अफ्रिकेसाठी लुथो सिम्पाला आणि जॉर्ज लिंडे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले.
तत्पूर्वी दक्षिण अफ्रिका संघाने पहिल्या डावात मोठी धावंसख्या उभारली होती. दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात ७ विकेट्सच्या नुकसानावर ५०९ धावा केल्या होत्या. दक्षिण अफ्रिकेचे आव्हान मोडीत काढण्यासाठी भारतीय संघाला अजून २०१ धावांची आवश्यकता आहे. अशात आता सामना निकाली ठरण्याची खूपच कमी शक्यता आहे. सामन्याची वाटचाल अनिर्णित होण्याच्या दिशेने सूरू आहे.