ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने त्यांच्या गोलंदाजी शैलीने क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याने त्याच्या कारकिर्दीत कसोटीमध्ये खेळताना १४५ सामन्यात तब्बल ७०८ विकेट्स घेतल्या. यातील ४४८ विकेट्स त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खेळताना घेतल्या आहेत.
त्याने १४५ कसोटीत खेळताना ३७ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तर १० वेळा एका सामन्यात १० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. तो कसोटीतील एका डावात सर्वाधिकवेळा ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मुथय्या मुरलीधरनच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मात्र कसोटीच्या तुलनेत वनडेत मात्र त्याची कारकिर्द इतकी बहरली नाही. त्याने १९४ वनडे सामने खेळताना २९३ विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याला केवळ एकदाच ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी करता आली आहे. ही कामगिरी त्याने १९९६ ला वेस्ट इंडीज विरुद्ध केली होती.
याउलट भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने २ वेळा वनडेत ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. सचिन हा भारताचा पार्टटाईम लेगस्पिनर होता. तो बऱ्याचदा सामन्यात मुख्य गोलंदाजांना विश्रांती म्हणून मधली षटके टाकायचा. पण त्याने २ वेळा वनडेत ५ पेक्षा अधिक विकेट घेण्याचीही मोठी कामगिरी केली आहे.
त्याने पहिल्यांदा अशी कामगिरी १ एप्रिल १९९८ ला कोची येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना केली होती. त्या सामन्यात ऑस्ट्रेलिया ३१० धावांचा पाठलाग करत असताना ३ बाद २०३ धावा अशा भक्कम स्थितीत होती. त्यावेळी सचिनने चेंडू हातात घेत ऑस्ट्रेलियाच्या तब्बल ५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था ९ बाद २५९ अशी बिकट झाली.
सचिनने तेव्हा स्टिव्ह वॉ, मायकल बेवन, डॅमिएन मार्टिन, टॉम मूडी आणि डॅरेन लेहमन यांना बाद केले होते. सचिनच्या या कामगिरीमुळे भारताने हा सामना ४१ धावांनी जिंकला.
विशेष म्हणजे यानंतर ७ वर्षांनी २ एप्रिल २००५ ला कोची येथेच सचिनने वनडेमध्ये दुसऱ्यांदा ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. तेव्हा त्याने पाकिस्तान विरुद्ध ५० धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या.
त्या सामन्यात २८२ धावांचा पाठलाग पाकिस्तानचा संघ करत होता. त्यांनी ४ विकेट्स ६४ धावांवरच गमावल्या होत्या. पण कर्णधार इंझमाम उल हक आणि मोहम्मद हाफिजमध्ये ५ व्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी झाली. त्यांची भागीदारी रंगत होती. पण याचवेळी सचिनने इंजमामला बाद केले.
त्यानंतर त्याने नियमित कालांतराने अब्दुल रझाक, शाहिद आफ्रिदी, मोहम्मद सामी आणि मोहम्मद हाफिज यांना बाद करत ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे पाकिस्तानचा डाव १९४ धावांवरच संपुष्टात आला आणि भारताने हा सामना ८७ धावांनी जिंकला.
ट्रेडिंग घडामोडी –
हे आहेत आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारे क्रिकेटपटू