भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पार पडलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू खेळाडू काइल जेमिसनने आपल्या वेगवान गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना नांग्या टाकण्यास भाग पाडले होते. जेमिसनच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. अशातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही काइल जेमिसनच्या कामगिरीवर कौतुकाची थाप मारत त्याच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, “काइल जेमिसन एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. तो पुढे जाऊन क्रिकेटविश्वामध्ये एक अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू होऊ शकतो. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा न्यूझीलंड संघाकडून खेळताना पाहिले होते; तेव्हा त्याने मला आपल्या कामगिरीने खुश केले होते. जर त्याच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर तो उंचकाठीचा गोलंदाज आहे. त्यामुळे चेंडू स्विंग करण्यापेक्षा तो सीमचा वापर करून गोलंदाजी करण्याचा जास्त प्रयत्न करत असतो. तो टीम साउदी, ट्रेंट बोल्ट आणि निल वॅगनर यांच्या तुलनेत खूप वेगळा गोलंदाज आहे.” (Sachin Tendulkar praised kiwi all rounder Kyle jamieson)
तसेच तो पुढे म्हणाला की, “काइल जेमिसन सतत खेळपट्टीचा वापर करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्नात असतो. त्याने हाताचा एक कोन बनवून इनस्विंग गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीमध्ये वेगळेपण होते आणि मला त्याचे सातत्य खूप भावले. विलियमसनसोबत मिळून त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमण फटकेबाजी करायला सुरुवात केली होती. एक उंच काठीचा फलंदाज पुढे येऊन फलंदाजी करणे चांगले आहे. पुढे येऊन फलंदाजी करत असल्यामुळे गोलंदाजांची लाईन खराब झाली होती. त्यामुळे त्यांना शॉर्ट गोलंदाजी करावी लागत होती.”
सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला की, “सामन्याच्या सहाव्या दिवशी पहिल्याच तासात विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा बाद होणे निराशाजनक होते. शेवटच्या दिवशी हे महत्वाचे होते की, सुरुवातीच्या पहिल्या तासात एकही गडी बाद न होता, भारतीय संघाने फलंदाजी करावी. त्यानंतर भारतीय संघात असे फलंदाज होते जे मोठे फटके खेळू शकत होते. दिवसाच्या सुरुवातीला चांगली भागीदारी करणे आवश्यक होते.”
जेमिसनने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ४४ षटके गोलंदाजी केली होती. यामध्ये त्याने ६१ धावा देत ७ गडी बाद केले होते. यामधे त्याने कर्णधार कोहलीला दोन्ही डावात बाद केले होते.
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाविरुद्ध षड्यंत्र, पंचांमुळे हुकले ‘या’ खेळाडूचे शतक
‘या’ कारणामुळे कोहलीने किवी समर्थकांना तोंडावर बोट ठेऊन शांत बसण्याचा केला होता इशारा
पुजाराच्या सुमार फलंदाजीने संघ व्यवस्थापनाला विचार करण्यास पाडले भाग, इंग्लंडविरुद्ध मिळणार डच्चू!