भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याची गणना क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये होते. धोनी हा जगातील एकमेव असा क्रिकेट कर्णधार आहे ज्याने सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. भारतीय क्रिकेट एका खराब काळातून जात असताना त्याच्याकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा आली होती. त्याने आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. मात्र, कोणत्या कारणांमुळे आपण धोनीला कर्णधारपदाचा दावेदार म्हणून पुढे केले होते याचा खुलासा माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने नुकताच केला आहे.
क्रिकेट विश्वातील अनेक विक्रम नावावर असलेल्या सचिन तेंडुलकर याने नुकताच एका कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. त्या कार्यक्रमात धोनी कशाप्रकारे भारतीय संघाचा कर्णधार बनला याबाबत त्याने खुलासा केला. सचिन म्हणाला,
“मी इंग्लंडमध्ये असताना मला संघाचे नेतृत्व करण्याबाबत विचारले गेले होते. त्यावेळी मी धोनीचे नाव सुचवले. तो पुरेसा अनुभवी नव्हता. मात्र मी त्याच्यासोबत स्लीपमध्ये असताना ज्या काही गोष्टी बोलायचो, त्यावरून तो एक चांगला नेता होणार असल्याचे दिसत होते.”
सचिन पुढे म्हणाला,
“एकीकडे राहुल शांत व संयमी होता. दुसरीकडे धोनी मला असा वाटला जो विरोधी संघापेक्षा एक पाऊल पुढे असत. जिंकण्याची एक प्रक्रिया असते. क्रिकेटमध्ये दिवसाअखेर धावफलक महत्त्वाचा असतो. धोनी त्या प्रक्रियेने चालणारा खेळाडू मला वाटत. याचमुळे मी त्याच्या नावाची शिफारस केली.”
धोनी थेट 2007 टी20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी उतरला होता. भारताने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत तो विश्वचषक आपल्या नावे केला. त्यानंतर 2011 वनडे विश्वचषक, 2013 चॅम्पियन ट्रॉफी देखील त्याने भारतीय संघाला जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. तसेच, त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहोचला होता.
(Sachin Tendulkar Reveal why He Suggest Dhoni Name For Captaincy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BANvIND: ‘मॅचविनर’ कुलदीपला बाहेर केल्याने भडकले चाहते, कर्णधार राहुलची लावली क्लास
पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना संघाला विजेतेपद