भारतीय बॅडमिंटनमधील सर्वोच्च स्थान गाठलेल्या जोडीपैकी सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यप यांनी आपले सात वर्षांचे वैवाहिक नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून परस्पर संमतीने विभक्त होण्याची माहिती दिली असून, “शांती, वाढ आणि स्वतःच्या आरोग्यासाठी” हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सायना नेहवालने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत म्हटले की, “कधी कधी आयुष्य वेगवेगळ्या दिशांनी घेऊन जातं. खूप विचारांती आणि परस्पर चर्चा करून मी आणि कश्यपने आमचे मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही शांती, वैयक्तिक वाढ आणि बरे होणं याचा मार्ग निवडत आहोत.”
तिने पुढे लिहिलं, “गेल्या आठवणींसाठी मी कृतज्ञ आहे आणि पुढच्या आयुष्यासाठी त्याला सर्व शुभेच्छा देते. या काळात आमच्या खासगीपणाचा सन्मान ठेवावा, ही नम्र विनंती.”
???? India's Badminton Stars Saina Nehwal & Parupalli Kashyap have decided to separate! pic.twitter.com/887oVHIojx
— The Khel India (@TheKhelIndia) July 13, 2025
सायना आणि कश्यपने डिसेंबर 2018 मध्ये विवाह केला होता. या दोघांची ओळख आणि नातं हैदराबादमधील पुलेला गोपीचंद अकादमीत प्रशिक्षण घेत असतानाच दृढ झालं.
सायना ही भारताच्या सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटूंपैकी एक मानली जाते. 2012च्या लंडन ऑलिंपिकमध्ये तिने कांस्य पदक जिंकून इतिहास रचला होता. दुसरीकडे, कश्यपने 2014 मध्ये राष्ट्रकुल सुवर्ण पदक जिंकत जागतिक टॉप 10 मध्ये स्थान मिळवलं होतं.
भारतीय बॅडमिंटन विश्वात आदर्श जोडपं म्हणून ओळखली जाणारी ही जोडी वेगवेगळ्या वाटेने जाणार असल्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.






