भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिका खेळत आहे. या ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने पूर्ण झाले आहेत. या दोन्ही सामन्यांत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर अनेकांनी भारतीय खेळाडूंवर ताशेरे ओढायला सुरुवात केली. मात्र, भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या याचे कौतुक केले आहे.
संजय बांगर (Sanjay Bangar) म्हणाले की, “हार्दिक पंड्याची (Hardik Pandya) ताकद आहे की तो वेगवेगळ्या फलंदाजी क्रमांवर वेगवेगळ्या भूमिका बजावू शकतो, तो एक अतिशय वैविध्यपूर्ण खेळाडू आहे ज्याने त्याच्या खेळाची मूलभूत पातळी सुधारण्यासाठी बरेच काम केले आहे. तुम्ही त्याला चौथ्या क्रमांकावर आणि सहाव्या क्रमांकावरही संधी देऊ शकता. जेव्हा मी हार्दिकशी बोलायचो तेव्हा तो नेहमी म्हणत असे की त्याला चांगला पाया हवा आहे. त्यांनी नेहमीच याकडे खूप लक्ष दिले आहे. तुमचा खेळ स्थिरावल्यावर तुम्ही सामन्याच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकता. ही चांगली गोष्ट आहे.”
पंडयाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात केवळ १२ चेंडूत ३१ धावा केल्या होत्या. प्रथम फलंदाजी करताना भारताने २११ धावा केल्या होत्या मात्र त्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर रविवारी खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाचा पराभव झाला.
दरम्यान, या मालिकेपूर्वी गेल्या वर्षी झालेल्या टी२० विश्वचषकादरम्यान हार्दिक भारतीय जर्सीत दिसला होता. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने दमदार पुनरागमन केले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्सची कमान सांभाळताना त्याने अप्रतिम खेळ दाखवला. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने प्रथमच विजेतेपदावर कब्जा केला. आयपीएएल २०२२ मध्ये हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्ससाठी अँकरची भूमिका बजावली होती. त्याचा स्ट्राइक रेट जवळपास १३० होता. पण भारतासाठी टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळताना त्याने २५० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रिषभ पंतच्या भारतीय संघाला ‘या’ चुका पडल्या भारी, गमावली सलग दुसरी टी२०
अनुष्कासंगे विराटने मालदीवच्या बीचवर घालवल्या सुट्ट्या, शर्टलेस फोटोने इंटरनेटचं वाढवलं तापमान
माजी भारतीय क्रिकेटरनेच इंडियन टीमवर उभे केले प्रश्न, प्रशिक्षक द्रविडलाही दिला सल्ला