दक्षिण आफ्रिका संघाने भारताविरुद्धचा सलग दुसरा टी-२० सामना जिंकला. मालिकेतील हा दुसरा सामना कटकच्या बाराबती स्टेडियमवर रविवारी (१२ जून) खेळला गेला. खेळपट्टी गोलंदाजीसाठी पोषक असल्यामुळे फलंदाज धावा करण्यासाठी झगडताना दिसले. तरीदेखील दक्षिण आफ्रिका संघाने हा सामना ४ विकेट्स राखून आणि १८.२ षटकात जिंकला. चला तर जाणून घेऊया भारताच्या पराभवाची प्रमुख कारणे.
१.फलंदाजांनी केलेली निराशा
भारतीय संघाचे महत्वाचे फलंदाज या सामन्यात अपयशी ठरले. युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड चार चेंडूत एक धाव करून बाद झाला. श्रेयस अय्यर मोठी खेळी करेल अशी अपेक्षा होती, पण त्याला देखील ४० धावांवर समाधान मानावे लागले. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या रिषभ पंत (७ चेंडूत ५ धावा) आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या (१२ चेंडूत ९ धावा) यांनाही काही कमाल करता आली नाही. परिणामी भारताला प्रथम फलंदाजी करत असताना मोठी धावसंख्या उभी करता आली नाही.
२. फलंदाजी क्रमात केलेले अमान्य बदल
भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमात देखील काही बदल केले गेले, ज्यामुळे संघाला नुकसान सोसण्याची वेळ आली. शेवटच्या षटकांमध्ये भारताला वेगाने धावा करणाऱ्या फलंदाजांची आवश्यकता होती. सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेला दिनेश कार्तिक अशा वेळी धमाकेदार प्रदर्शन करू शकत होता. पण कर्णधार रिषभ पंतने अष्टपैलू अक्षर पटेलला कार्तिकच्या आधी फलंदाजीसाठी पाठवले. अक्षर जेव्हा १० धावा करून बाद झाला, तेव्हा कार्तिक खेळपट्टीवर आला आणि २१ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या. कार्तिक जर काही वेळ आधी खेळपट्टीवर आला असता, तर संघाची धावसंख्या जास्त झाली असती.
३. गोलंदाजीत अनियमितता
भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगले प्रदर्शन केले. यामध्ये भुवनेश्वर कुमारच्या पॉवरप्लेमधील तीन विकेट्सच्या प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. परंतु नंतर मध्यक्रमातील हेन्रिच क्लासेन लवकर बाद झाला नाही. क्लासेनने अवघ्या ४६ चेंडूत ८१ धावा चोपल्या आणि आफ्रिकी संघासाठी विजय सोपा बनवला. यादरम्यान त्यांचा कर्णधार टेंबा बावुमा आणि डेविड मिलरने महत्वाच्या धावा केल्या. मधल्या षटकांमध्ये जर भारतीय गोलंदाज विकेट्स घेऊ शकले असते, तर नक्कीच सामना वेगळ्या दिशेने गेला असता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
माजी भारतीय क्रिकेटरनेच इंडियन टीमवर उभे केले प्रश्न, प्रशिक्षक द्रविडलाही दिला सल्ला
अगग! पाकिस्तानचे फलंदाज विंडीजच्या ‘कामचलाऊ’ गोलंदाज पूरनपुढे नतमस्तक, एक-दोन नव्हे चौघे तंबूत