टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. या सामन्यात एकेकाळी दक्षिण आफ्रिकेचा संघ वरचढ दिसत होता. त्यांना शेवटच्या 30 चेंडूत विजयासाठी 33 धावांची आवश्यकता होती. मात्र यानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केलं. हार्दिक पांड्यानं आधी हेनरिक क्लासेनची विकेट घेतली. त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगनं उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताला सामना जिंकवून दिला.
मात्र या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाला स्टार फलंदाज विराट कोहलीला. त्यानं 59 चेंडूत 76 धावांची संयमी खेळी खेळली, ज्याच्या जोरावर भारतानं प्रथम फलंदाजी करताना स्कोरबोर्डवर 176 धावा लावल्या. मात्र विराटला सामनावीर पुरस्कार मिळण्यावर माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
‘ईएसपीएन क्रिकइन्फो’वरील शोमध्ये संजय मांजरेकर म्हणाले की, कोहलीच्या 59 चेंडूत 76 धावांच्या खेळीनं भारतीय संघाला अडचणीत आणलं होतं. त्यानंतर वेगवान गोलंदाजांनी सामना वाचवला. ‘प्लेअर ऑफ द मॅच’साठी माझी निवड कोहली नसून एखादा भारतीय गोलंदाज असता.
संजय मांजरेकर म्हणाले, “या सामन्यात भारताचा सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक हार्दिक पांड्यानं केवळ दोन चेंडूंचा सामना केला. त्यामुळे मला वाटते की, भारताची फलंदाजी चांगली होती, परंतु विराट कोहलीनं एक अशी खेळी खेळली होती, ज्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला असता.”
संजय मांजरेकर पुढे म्हणाले, “भारत पराभवाच्या छायेत होता. दक्षिण आफ्रिकेसाठी विजयाची शक्यता 90 टक्के होती. विराट कोहलीनं जवळपास 128 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली. माझा सामनावीर एखादा गोलंदाज असता, कारण त्यानं भारतीय संघाला पराभवातून बाहेर काढत विजय मिळवून दिला.”
महत्त्वाच्या बातम्या –
“रोहित शर्मानंतर हा खेळाडू भारतीय संघाचा कर्णधार व्हावा”, वीरेंद्र सेहवागनं थेटच सांगितलं
भारतीय महिला संघानं उडवला दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा! एकमेव कसोटीत 10 गडी राखून दणदणीत विजय
टी20 वर्ल्डकपच्या ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ची घोषणा; भारतीय खेळाडूंचा दबदबा तर अफगाण खेळाडूंनाही स्थान