देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळणाऱ्या सरफराज खान याला लवकरच भारताच्या कसोटी संघात सहभागी केले जाऊ शकते. सरफराजने रणजी ट्रॉफी २०२१-२२च्या हंगामात आतापर्यंत शानदार प्रदर्शन केले आहे. त्याने मध्य प्रदेश संघाविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शतक केले आहे, ज्याच्या जोरावर मुंबई संघ मध्य प्रदेशला ३७५ धावांचे आव्हान देण्यात यशस्वी ठरला आहे.
सरफराजचे (Sarfaraz Khan) रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामातील प्रदर्शन प्रशंसनीय राहिले आहे. त्याने ४ शतके आणि २ अर्धशतकांच्या मदतीने ९३७ धावा केल्या आहेत. तसेच तो रणजीच्या चालू हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही अव्वलस्थानी आहे. त्याच्या या प्रदर्शनाचे फळ त्याला लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, २४ वर्षीय सरफराजला बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात (Test Call Up To Sarfaraz Khan) जागा मिळू शकते.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्याने लिहिले आहे की, “आता सरफराजवर दुर्लक्ष करणे कठिण आहे. त्याचे प्रदर्शन त्याच्यातील कौशल्य आणि क्षमतेबद्दल स्पष्टपणे सांगून जाते. तो भारतीय संघातील अनेकांवर दबाव आणत आहे. जेव्हा निवडकर्ते बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करतील, तेव्हा ते याबद्दल निश्चिंत होतील. त्याने गेल्यावर्षी भारत अ संघाकडून दक्षिण आफ्रिकेत शानदार प्रदर्शन केले होते. तो एक चांगला क्षेत्ररक्षकही आहे.”
दरम्यान मध्य प्रदेशच्या (Mumbai Vs Madhya Pradesh) गोलंदाजांचा सामना करताना सरफराजने अंतिम सामन्यात झुंजार शतकी खेळी (Sarfaraz Khan Century) केली. २४३ चेंडू खेळत त्याने १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १३४ धावा फटकावल्या. हे त्याचे चालू रणजी हंगामातील चौथे शतक होते. या शतकी खेळीसह त्याने आपल्या रणजी ट्रॉफीतील २००० धावाही पूर्ण केल्या आहेत. सरफराजने त्याच्या चालू हंगामातील ९०० धावाही पूर्ण केल्या आहेत. मागील हंगामातही (२०१९-२०) त्याने ६ सामन्यात ३ शतकांच्या मदतीने ९२८ धावा केल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पांड्याची सेना आयर्लंडमध्ये दाखल, इथेही फडकावणार विजयी पताका?