---Advertisement---

SAvsIND, 3rd Test, Live: तिसऱ्या दिवसाखेर यजमानांची झुंज; भारताच्या विजयाच्या आशा कायम

IND-SA
---Advertisement---

केपटाऊन|  दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सध्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारपासून (११ जानेवारी) सुरू झाला आहे. केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे होत असलेल्या या कसोटीचा गुरुवारी दुसरा दिवस आहे. या दिवशी रिषभ पंतने शतक पूर्ण केले आहे. मात्र, भारताचा दुसरा डाव ६७.३ षटकांत १९८ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताने पहिल्या डावातील १३ धावांच्या आघाडीसह दक्षिण आफ्रिकेसमोर २१२ धावांचे आव्हान ठेवले आहे.

दक्षिण आफ्रिकेची अखेरच्या डावात झुंज
भारतीय संघाकडून विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्‍य मिळाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार डीन एल्गर व एडेन मार्करम यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी २३ धावा जोडल्या. शमीने मार्करमला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. मात्र, त्यानंतर एल्गर व कीगन पीटरसन ही जोडी मैदानात जमली. दोघांनी भारतीय गोलंदाजांचा सामना करत संघाला शतकी मजल मारून दिली. दिवसातील अखेरचे षटक सुरू असताना बुमराहने एल्गरला बाद करत चाहत्यांना दिलासा दिला. एल्गर ३० धावांवर बाद झाला. तर, पीटरसन ४८ धावांवर नाबाद आहे. दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी अद्याप १११ धावांची आवश्यकता आहे.

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताचा दुसरा डाव सुरुवातीच्या पडझडीनंतर विराट कोहली आणि रिषभ पंत या दोघांनी सांभाळला होता. या दोघांनी दुसऱ्या सत्राचीही सुरुवात संयमी केली. त्यामुळे आता हे दोघेही दक्षिण आफ्रिकेसाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत होते. मात्र, दुसऱ्या सत्रात डावाच्या ४९ व्या षटकात लुंगी एन्गिडी एक बाजू संयमी खेळ करत सांभाळणाऱ्या विराटला बाद केले आणि भारताला मोठा धक्का दिला.

विराटने १४३ चेंडूत २९ धावांची खेळी केली. विराटचा झेल एडेन मार्करमने घेतला. विराट बाद झाल्याने त्याची आणि पंत मधील ५ व्या विकेटसाठी झालेली ९४ धावांची भागीदारीही तुटली. विराट बाद झाल्यानंतर आर अश्विन फलंदाजीसाठी आला. त्याने पंतला साथ देण्याचा प्रयत्न केला, मात्र, अश्विनला लुंगी एन्गिडीने ७ धावांवर माघारी धाडले. पाठोपाठ ५७ व्या षटकात शार्दुल ठाकूरही लुंगी एन्गिडीविरुद्धच खेळताना ५ धावांवर बाद झाला.

तसेच ५९ व्या षटकात कागिसो रबाडाने उमेश यादवला शुन्यावर बाद केले. तसेच मार्को जेन्सनने मोहम्मद शमीला शुन्यावर माघारी धाडले. त्यामुळे दुसरी बाजू सांभाळणाऱ्या पंतचे शतक होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, पंतने स्वत:कडेच स्ट्राईक ठेवत आपले चौथे शतक पूर्ण केले. मात्र, ६८ व्या षटकात बुमराह २ धावांवर मार्को जेन्सनच्या चेंडूवर बाद झाल्याने भारताचा डाव १९८ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २१२ धावांचे आव्हान ठेवले. रिषभ पंत १०० धावांवर नाबाद राहिला.

दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जेन्सनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तसेच कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडीने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

विराट-पंतने सावरला भारताचा डाव

तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने दुसऱ्या डावातील १८ षटकापासून आणि २ बाद ५७ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. भारताकडून दुसऱ्या दिवसाखेर नाबाद असलेल्या कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्या जोडीनेच तिसऱ्या दिवशी भारताच्या डावाला पुढे नेण्यास सुरुवात केली.

मात्र, दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर मार्को जेन्सनने भारताला मोठा धक्का देत पुजाराला ९ धावांवर बाद केले. त्याच्यापाठोपाठ १९ व्या षटकात अजिंक्य रहाणे देखील १ धाव करून कागिसो रबाडाच्या गोलंदाजीचा शिकार झाला. त्यामुळे विराटला साथ देण्यासाठी रिषभ पंत मैदानात उतरला.

विराट आणि पंत या दोघांनी भारताच्या फलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत आणखी पडझड होणार नाही, याची काळजी घेतली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी तर केलीच, पण पंतने वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केले. त्याने ५८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे पहिले, तर कसोटी कारकिर्दीतील ८ वे अर्धशतक आहे.

त्यामुळे भारताने तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेर ४३ षटकात ४ बाद १३० धावा केल्या आणि पहिल्या डावातील १३ आघाडीमुळे भारत आता १४३ धावांनी आघाडीवर आहे. भारताकडून पहिल्या सत्राखेर विराट २८ धावांवर आणि पंत ५१ धावांवर नाबाद होते.

तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव २२३ धावांवर संपुष्टात आला होता. तर दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात २१० धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे भारताला १३ धावांची आघाडी मिळाली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---