इंडियन प्रीमियर लीग २०२१ मधील दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. दोन्हीमध्ये मुंबईचा सपाटून पराभव झाला आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली होती. दुसऱ्या सामन्यात रोहितने पुनरागमन केले, पण हार्दिक बेंचवरच बसून राला. हार्दिकला खेळायला न देण्याबाबत त्याचे चाहते वेगवेगळे अंदाज बांधत होते. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड यांनी अष्टपैलू हार्दिक पांड्याला न खेळवण्याचे कारण उघड केले आहे.
ते म्हणाले की, हार्दिक आतापर्यंत पूर्णपणे फिट नव्हता. तो लकवरच खेळण्याच्या स्थितीत येणार आहे. बाँड म्हणाले की, त्याच्या फ्रँचायझी संघाला भारतीय संघाच्या भावी गरजा लक्षात घेऊन, त्याला मैदानात उतरवण्याची घाई केली जात नाहीये.
खरं तर, टी-२० विश्वचषक आयपीएलनंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवला जाणार आहे. यासंदर्भात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सर्व फ्रँचायझींना विश्वचषक संघातील निवडक प्रमुख खेळाडूंवर कामाचा भार न टाकता त्यांना विश्रांती देण्यास सांगितले होते. याअंतर्गत, मुंबई संघ हार्दिक पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतरच त्याला खेळवणार आहे.
गेल्या वर्षी पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर हार्दिक पांड्याने फारशी गोलंदाजी केलेली नाही. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात तो एकही सामना खेळलेला नाही. मात्र, बाँड म्हणाले की, हार्दिक चांगला सराव करत आहे आणि स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये त्याला संधी मिळू शकते.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बाँड म्हणाले की, “हार्दिक देखील रोहितप्रमाणे चांगला सराव करत आहे. तो लवकरच खेळताना दिसेल. आम्ही आमच्या संघाच्या गरजा या भारतीय संघाच्या गरजांसोबत जुळवून घेत आहोत. फ्रँचायझी ही एक गोष्ट खूप चांगल्याप्रकारे करत आहे. आम्ही केवळ ही स्पर्धा जिंकू पाहत नाही, तर पुढील टी-२० विश्वचषक लक्षात घेऊन आपल्या खेळाडूंच्या कामाचा ताणही संतुलित करत आहोत. आम्हाला आशा आहे की, हार्दिक पुढील सामन्यात पुनरागमन करेल. मी आधी म्हटल्याप्रमाणे, तो आजही चांगला सराव करत आहे.”
आयपीएल २०२१ च्या गुणतालिकेबाबत बोलायचं झालं, तर मुंबई संघ थेट सहाव्या स्थानी घसरला आहे. आतापर्यंत त्यांनी एकूण ९ सामने खेळले आहेत. त्यातील ४ सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे, तर उर्वरित ५ सामन्यात त्यांना सपाटून पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यांचे गुण ८ आहेत. तसेच अव्वल क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्ज संघ असून त्यांचे १४ गुण आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-आज रंगणार आयपीएल उत्तरार्धातील पहिले ‘डबल हेडर’; युवा राजस्थानसमोर अनुभवी दिल्लीचे आव्हान
-सीएसकेविरुद्धच्या एका अर्धशतकाने कोहलीच्या नावे ‘विराट’ विक्रमांची नोंद






