नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं. या दोघांच्या यशात राष्ट्रीय पिस्तूल नेमबाजी प्रशिक्षक समरेश जंग यांचं महत्त्वाचं योगदान होतं. मात्र आता त्यांच्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
वास्तविक, समरेश जंग यांच्यासाठी एक अडचण निर्माण झाली असून, त्यांच्या घर पाडलं जाण्याची शक्यता आहे. ऑलिंपियन समरेश जंग हे सिव्हिल लाईन्स, नवी दिल्ली येथील खैबर पास परिसरात राहतात. त्यांना एक नोटीस मिळाली आहे. नोटीसमध्ये म्हटलं आहे की, खैबर पास कॉलनी ज्या जमिनीवर आहे, ती जमीन संरक्षण मंत्रालयाची आहे. त्यामुळे तेथील बांधकाम बेकायदेशीर आहे.
समरेश जंग यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “भारतीय नेमबाजांनी दोन ऑलिम्पिक पदकं जिंकल्यानंतर मी अतिशय उत्साहात घरी परतलो. परंतु माझं घर आणि संपूर्ण परिसर दोन दिवसांत उद्ध्वस्त होणार असल्याची निराशाजनक बातमी मला मिळाली. मी एक ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त असल्यामुळे किमान मला आशा आहे की मला आणि माझ्या कॉलनीतील लोकांना सन्मानानं बाहेर जाता येईल. मी या प्रकरणावर स्पष्टता आणण्यासाठी आणि जागा खाली करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा वेळ देण्याचं आवाहन करतो.”
समरेश जंग पुढे म्हणतात की, “एक ऑलिम्पियन म्हणून त्यांना किमान सन्माननीय निरोपाची अपेक्षा आहे. लोकांची घरं का पाडली जात आहेत? अचानक संपूर्ण वसाहत बेकायदेशीर का घोषित करण्यात आली?”, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. ते पुढे म्हणाले, “काल रात्री आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला दोन दिवसात ही जागा सोडावी लागेल. माझं कुटुंब गेल्या 75 वर्षांपासून येथे राहत आहे. आम्ही 1950 पासून येथील रहिवासी आहोत.”
हेही वाचा –
चक दे इंडिया! तब्बल 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलिया भारताकडून चारीमुंड्या चीत
मनू भाकर पदकांची हॅट्ट्रिक लगावणार! पॅरिस ऑलिम्पिकच्या आणखी एका फायनलमध्ये मारली धडक
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये राडा! ट्रान्सजेंडर बॉक्सरनं महिला बॉक्सरला अवघ्या 46 सेकंदात दिला धोबीपछाड