न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा उपकर्णधार श्रेयस अय्यरचे संघात पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो रिकव्हरी करत होता आणि त्यामुळेच त्याला दक्षिण आफ्रिका दौरा मुकावा लागला होता. आता
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला पुन्हा संघात स्थान मिळाले आहे. कमबॅकनंतर अय्यरसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या पुढील दोन सामन्यांसाठी तो मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.
मुंबईचा नियमित कर्णधार शार्दुल ठाकूरला पायाच्या स्नायूची (पिंडली) दुखापत झाली असून, यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी आता अय्यर लीग स्टेजच्या सामन्यांमध्ये कप्तानी करताना दिसेल. MCA सचिव डॉ. उन्मेश खानविलकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “मुंबई क्रिकेट असोसिएशनला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, श्रेयस अय्यर विजय हजारे ट्रॉफीच्या उर्वरित लीग सामन्यांमध्ये मुंबईच्या सीनियर पुरुष संघाचे नेतृत्व करेल. तो शार्दुल ठाकूरची जागा घेईल, जो दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला असून निवडीसाठी उपलब्ध नाही.”
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 च्या हंगामात मुंबईचे पुढील दोन सामने हिमाचल प्रदेश आणि पंजाबविरुद्ध होणार आहेत. 6 जानेवारीला जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हिमाचल आणि मुंबई यांच्यात सामना होईल. अय्यरचा विजय हजारे ट्रॉफीमधील हा पुनरागमन सामना असेल. त्यानंतर 8 जानेवारीला पंजाबविरुद्ध दुसरा सामना होईल, जो लीग स्टेजमधील मुंबईचा शेवटचा सामना असेल.
श्रेयस अय्यरचे टीम इंडियाच्या स्क्वाडमध्ये पुनरागमन झाले असले तरी, त्याच्या फिटनेसबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह आहे. जर त्याला BCCI CoE (Center of Excellence) कडून परवानगी मिळाली नाही, तर तो वनडे मालिकेचा भाग होऊ शकणार नाही. रिपोर्ट्सनुसार, त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडची एन्ट्री होऊ शकते. मात्र, अय्यर सध्या घरगुती क्रिकेट खेळत असून, तिथे आपली मॅच फिटनेस सिद्ध करून तो तीन महिन्यांनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो.






