भारतीय पुरुष संघात बीसीसीआयने ज्याप्रकारे मोठे बदल केले. त्याच प्रकारे महिला संघात एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. महिला वनडे आणि कसोटी संघाची कर्णधार मिताली राज (mithali raj) पुढच्या वर्षी न्यूझीलंडमधील विश्वचषकानंतर निवृत्ती घेऊ शकते. मितालीनंतर संघ नवीन कर्णधाराच्या शोधात असेल आणि स्मृती मंधाना (smriti manthan) यासाठी योग्य पर्याय ठरू शकते.
बुधवारी (८ डिसेंबर) बीसीसीआयने विराट कोहलीकडून भारताच्या वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेतले आणि रोहित शर्मावर ही जबाबदारी सोपवली. तसेच अजिंक्य रहाणेकडून कसोटी संघाचे उपकर्णधारपद काडून रोहितला देण्यात आले आहे. तत्पूर्वी, टी२० विश्वचषकानंतर विराटने स्वतःच्या इच्छेने टी२० संघाचे नेतृत्व सोडले होते आणि त्यानंतर रोहितने संघाची कमान सांभाळली होती.
भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांना असे वाटते की, हरमनप्रीत कौर २०१६ नंतर भारताच्या टी२० संघाची कर्णधार राहिली. मात्र, तिने फलंदाजीमध्ये अपेक्षित प्रदर्शन केले नाही. याच कारणास्तव कसोटी संघात ती मिताली राजची जागा घेण्यासाठी योग्य नसेल. तर, दुसरीकडे मंधानाने स्वतःला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये सामील केले आहे. शांता याबाबत म्हणाल्या की, “मितालीने निवृत्ती घेतल्यानंतर स्मृती आदर्श पर्याय असेल. ती भारतासाठी अप्रतिम प्रदर्शन करणारी खेळाडू राहिली आहे आणि तिला देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिली गेली पाहिजे.”
शांता बीसीसीआयच्या वरिष्ठ परिषदेच्या सदस्य आहेत. त्यांना असे वाटते की कर्णधारपदामुळे हरमनप्रीतच्या फलंदाजीवर प्रभाव पडला आहे. तसेच भारतीय संघाच्या यशासाठी हरमनप्रीने चांगली फलंदाजी करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर शांता यांनी मितालीनंतर कर्णधारपदासाठी स्मृती मंधानाचे नाव सुचवले आहे. मंधानाच्या कामगिरीचा विचार केला, तर तिने आतापर्यंत चार कसोटी, ६२ वनडे आणि ८४ टी२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच तिने मागच्या काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. तिने याठिकाणी मेलबर्न रेनेगेड्ससाठी खेळताना एक शतकदेखील ठोकले होते.
हरमनप्रीतच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर ती मागच्या जवळपास १२ महिन्यांपासून खराब फॉर्म आणि फिटनेसशी झुंज देत आहे. हरमनप्रीतने देखील बिग बॅश लीगमध्ये सहभाग घेतला होता आणि चांगले प्रदर्शन केले होते. आता पाहावे लागेल की, ती या लीगप्रमाणेच भारतीय संघासाठी खेळ करू शकते की नाही. भारतीय महिला संघाला आगामी विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्याच मायदेशात खेळायचे आहे. यानंतर संघ विश्वचषकात सहभाग घेणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
वरिष्ठ भारतीय महिला क्रिकेटपटू म्हणतेय, “आम्ही वुमेन्स आयपीएलबाबत आशावादी”
“२०१९ विश्वचषकातील त्या निर्णयाशी मी सहमत नव्हतो”; रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट