भारताचा कर्णधार विराट कोहली जसा उत्कृष्ट फलंदाज आहे, तसाच तो चांगला क्षेत्ररक्षकही आहे. याचाच प्रत्यय काल(8 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात पार पडलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात आला. विराटने ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात बाउंड्री लाइन जवळ शिमरॉन हेटमायरचा शानदार झेल घेतला.
या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ भारताने दिलेल्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारताच्या रविंद्र जडेजाने टाकलेल्या 14 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराटने लाँगऑनवरुन उजवीकडे पळत जाऊन शानदार झेल घेतला.
हा झेल घेतल्यानंतर विराटचा तोल गेला होता. मात्र त्याने हातातील चेंडू निसटून दिला नाही. तसेच त्याच्या शरिराचा स्पर्श बाउंड्री लाइनला लागणार नाही, याचीही त्याने काळजी घेतली. त्यामुळे हेटमायरला 23 धावांवर त्याची विकेट गमवावी लागली.
या झेलबद्दल सामन्यानंतर विराट म्हणाला, ‘ हा अशा झेलांपैकी होता ज्यामध्ये चेंडू हातात फसतो. लाईट समोर येत होते, पण मी फक्त चेंडूकडे लक्ष दिले आणि माझे दोन्ही हात पुढे लांब केले आणि चांगली गोष्ट अशी की चेंडू माझ्या हातात आला.’
तो पुढे म्हणाला, ‘मागील सामन्यात मी एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला, पण तो पकडू शकलो नाही. तूम्ही अनेकदा प्रयत्न करता त्यावेळी बऱ्याचदा यश येते आणि बऱ्याचदा यश मिळत नाही.’
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 170 धावा केल्या होत्या. भारताकडून शिवम दुबेने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रिषभ पंतने नाबाद 33 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना केसरिक विल्यम्स आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग वेस्ट इंडिजने 18.3 षटकात 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केला. वेस्ट इंडिजकडून सलामीवीर फलंदाज लेंडल सिमन्सने 45 चेंडून नाबाद 67 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर एव्हिन लूईस(40), हेटमायर(23) आणि निकोलस पुरन(38*) यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
भारताकडून गोलंदाजीत जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.






