शिखर धवनच्या नेतृत्वात भारताचा क्रिकेट संघ श्रीलंकेमध्ये १३ जुलैपासून तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भाग घेईल. तत्पूर्वी, नुकताच इंग्लंडमध्ये मालिका खेळून आलेला श्रीलंकेचा संघ सध्या विलगीकरणात आहे. श्रीलंका संघ ज्या इंग्लंड पथकाविरुद्ध मालिका खेळला होता त्या पथकातील सात सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने, भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिका होणार का याविषयी साशंकता निर्माण झाली होती. मात्र, आता या संशयाचे काळे डाग दूर झाले असून, मालिका नियोजित कार्यक्रमानुसार पार पडेल.
श्रीलंकेचा संघ विलगीकरणात
इंग्लंडविरुद्ध तीन वनडे व तीन टी२० सामने खेळल्यानंतर श्रीलंकेचा संघ ६ जुलै रोजी श्रीलंकेत परतला. त्यानंतर या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली असून, सर्व खेळाडूंचा अहवाल नकारात्मक आला आहे. संघाचे फलंदाज प्रशिक्षक ग्रॅण्ट फ्लावर यांचा अहवाल मात्र सकारात्मक आला असून, ते स्वतंत्ररीत्या विलगीकरणात आहेत. श्रीलंकेतील आरोग्य विभागाच्या नियमानुसार सर्व खेळाडूंना १२ तारखेपर्यंत विलिनीकरणात राहावे लागणार असून, त्यामुळे ते सराव सत्र आयोजित करू शकणार नाहीत. यादरम्यान ते केवळ हॉटेलमध्ये जिम सेशन एकत्ररित्या करू शकतील.
श्रीलंका संघात होणार महत्त्वपूर्ण बदल
इंग्लंड दौऱ्यावर एकही विजय मिळवण्यात श्रीलंका संघाला यश आले नाही. त्यामुळे संघाचा कर्णधार कुसल परेरा याला कर्णधारपदावरून हटवून अष्टपैलू दसुन शनाका याच्याकडे नेतृत्व देण्यात येईल. प्रमुख फलंदाज धनंजय डी सिल्वा उपकर्णधार असेल. कुसल परेरा याला फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करता यावे म्हणून, हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
असा असेल भारतीय संघाचा श्रीलंका दौरा
भारताच्या श्रीलंका दौऱ्याला १३ जुलैपासून वनडे मालिकेने सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर तीन सामन्यांची टी२० मालिका होईल. हे सर्व सामने कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहेत. शिखर धवन प्रथमच भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तो’ही चाहर आणि चक्रवर्ती बनू शकतो; धोनीच्या एकेकाळच्या हुकमी एक्क्याला दिग्गजाचा पाठिंबा
“…तर सूर्यकुमारला विश्वचषकात तिसऱ्या स्थानावर खेळवावे” माजी मुंबईकर खेळाडूचा सल्ला
‘देशासाठी अजून कमीत कमी एकतरी विश्वचषक खेळायचा आहे,’ अनुभवी यष्टीरक्षकाची इच्छा






