महिला आशिया चषक 2022मधील अंतिम सामना खेळणारे संघ निश्चित झाले आहेत. गुरुवारी (दि. 13 ऑक्टोबर) या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी दोन उपांत्य सामने खेळवण्यात आले. यामधील दुसरा उपांत्य सामना श्रीलंका आणि पाकिस्तान संंघात पार पडला. यामध्ये श्रीलंकेने 1 धावेने विजय मिळवत अंतिम सामना गाठला. दुसरा उपांत्य सामना खूपच रोमांचक राहिला. शेवटच्या चेंडूवर विजय मिळवल्याने श्रीलंका संघाच्या खेळाडूंनी अनोख्या अंदाजात आनंद साजरा केला.
श्रीलंका संघाच्या खेळाडूंनी सामना जिंकल्यानंतर एकत्र डान्स केला. यादरम्यान त्यांनी एका गाण्यावर एकसारख्या स्टेप्स केल्या. त्यांनी या क्षणाचा भरपूर आनंद लुटताना दिसल्या. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
https://twitter.com/imfemalecricket/status/1580518561407455232
सामन्याचा आढावा
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 122 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान महिला संघाला 6 विकेट्स गमावत फक्त 121 धावाच करता आल्या. त्यामुळे श्रीलंका संघाने हा सामना 1 धावेने जिंकत अंतिम सामन्यात पोहोचण्याचा मान मिळवला. पाकिस्तान महिला संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार बिस्माह मरूफ (Bismah Maroof) हिने सर्वाधिक धावा चोपल्या. तिने 41 चेंडूत 42 धावा केल्या. या धावा करताना तिने 4 चौकारही मारले. तिच्याव्यतिरिक्त निदा दार (26), मुनीबा अली (18) यांनीही योगदान दिले. त्यांच्याव्यतिरिक्त इतर एकाही फलंदाजाला 10 धावांचा आकडा पार करता आला नाही.
यावेळी श्रीलंका संघाकडून गोलंदाजी करताना कर्णधार इनोका रणवीरा हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने 2 षटके गोलंदाजी करताना 8 धावा देत 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तिच्याव्यतिरिक्त सुगंधिका कुमारी आणि कविशा दिलहारी यांनी प्रत्येकी एक विकेट घेत समाधान मानले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना हर्षिता समरविक्रमा (Harshitha Samarawickrama) हिने सर्वाधिक धावा चोपल्या. तिने 41 चेंडूत 35 धावा केल्या. या धावा करताना तिने 1 चौकार आणि 1 षटकारही मारला. तिच्याव्यतिरिक्त अनुष्का संजीवनी (26) हिलाच 20 धावांचा आकडा पार करता आला. इतर फलंदाजांमध्ये निलाक्षी डी सिल्वा (14), हसिनी परेरा (13) आणि कर्णधार चमारी अट्टापट्टू हिने 10 धावांचे योगदान दिले. त्यांच्या या धावांमुळे संघाला 122 धावांचा डोंगर उभा करण्यात हातभार लागला.
यावेळी पाकिस्तान संघाकडून गोलंदाजी करताना नशरा संधू (Nashra Sandhu) हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने 4 षटके गोलंदाजी करताना 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त सदिया इकबाल, निदा दार आणि ऐमन अनवर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
गुरुवारी (दि. 13 ऑक्टोबर) स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध थायलंड संघात पार पडला. यात भारताने 74 धावांनी विजय मिळवला आणि अंतिम सामन्यात स्थान मिळवले. आता शनिवारी (दि. 15 ऑक्टोबर) भारत आणि श्रीलंका संघात स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्याच्याविरुद्ध खेळताना विचारच करू नका’, गंभीरचा भारतीय फलंदाजांना सल्ला
आता कसं करणार! टी20 विश्वचषकापूर्वी महत्त्वाचे सराव सामने रद्द, यादीत बलाढ्य संघांचा समावेश





