शुक्रवारी (२३ जुलै) भारत आणि श्रीलंका या संघामध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला क्लीन स्वीप करण्याची सुवर्णसंधी होती. परंतु श्रीलंका संघातील खेळाडूंनी या सामन्यात जोरदार पुनरागमन केले. हा सामना श्रीलंका संघाने ३ गडी राखून आपल्या नावावर केला. मात्र ही मालिका भारतीय संघाने २-१ ने आपल्या नावावर केली. ही मालिका जिंकून जितका आनंद भारतीय संघाला झाला नसेल त्याहून अधिक जास्त आनंद श्रीलंका संघाला अखेरचा वनडे सामना जिंकून झाला असेल. काय आहे यामागील खास कारण? चला जाणून घेऊया.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४७ षटकअखेर २२५ धावा केल्या होत्या. यामध्ये पृथ्वी शॉने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली होती. तर पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या संजू सॅमसनने ४६ धावांचे योगदान दिले होते. तसेच या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाकडून अविष्का फर्नांडोने ७६ आणि भानुका राजपक्षेने ६५ धावांची खेळी करत हा सामना ३ गडी राखून श्रीलंका संघाला जिंकून दिला.
तब्बल ९ वर्षानंतर मायदेशात भारतीय संघाला केले पराभूत
श्रीलंका संघाचा सध्या सर्वात कठीण काळ सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पराभवाचा सामना करावा लागत आहे. एक दोन सामन्यात विजय मिळवण्याशिवाय त्यांना मालिका जिंकण्यात यश आले नाही. तसेच भारतीय संघाविरुद्ध मिळवलेला विजय श्रीलंका संघासाठी खूप खास आहे. कारण तब्बल ९ वर्षानंतर श्रीलंका संघाने भारतीय संघाला श्रीलंकेत पराभूत केले आहे.
श्रीलंका संघाने शेवटचा विजय २४ जुलै २०१२ रोजी मिळवला होता. त्यावेळी श्रीलंका संघाचा कर्णधार माहेला जयवर्धने होता. त्या सामन्यात भारतीय संघाला ९ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत श्रीलंकेत भारतीय संघाने १० वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये सर्व सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. (Srilanka beat India in an odi Series after 9 years at Home and away after 4 years)
तब्बल ४ वर्षानंतर वनडे सामन्यात भारतीय संघाचा पराभव
तसेच जगभरातील सर्व मैदानांवर तब्बल ४ वर्षानंतर श्रीलंका संघाने भारतीय संघाला पराभूत केले आहे. श्रीलंका संघाने १० डिसेंबर २०१७ मध्ये भारताविरुद्ध शेवटचा वनडे विजय मिळवला होता. हा सामना धर्मशाळाच्या एचपीसीए स्टेडियमवर खेळला गेला होता. या सामन्यात श्रीलंका संघाने भारतीय संघावर ७ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यानंतर दोन्ही संघ श्रीलंकेत २ वेळेस, भारतात २ वेळेस आणि इंग्लंडमध्ये (विश्वचषक २०१९) १ वेळेस आमने सामने आले आहेत. या सर्व सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे मालिकेनंतर आता टी२० सीरिजमध्ये श्रीलंकेला धूळ चारण्यास भारत सज्ज; पाहा पूर्ण वेळापत्रक
Video: लोकल भाषेत श्रीलंकन यष्टीरक्षकाचा गोलंदाजाला सल्ला; पुढच्याच चेंडूवर ‘अशी’ पडली संजूची विकेट
काय सांगता राव! ‘मालिकावीर’ पुरस्कार मिळूनही धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार आहे ‘या’ कारणामुळे नाराज