25 जून म्हणजे भारतीय क्रिकेटसाठी सुवर्ण दिन. 36 वर्षांपूर्वी याच दिवशी नवख्या भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडीजचा 1983 सालच्या विश्वचषकात 43 धावांनी पराभव करत विश्वविजेतेपद आपल्या नावे केले होते.
अंडर डॉग्ज म्हणुन या विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या कपिल देव यांच्या भारतीय संघाने अविश्वसनीय कामगिरी करत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती.
या विश्वचषकात भारताने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज सारख्या क्रिकेटमधील दादा संघाला पाणी पाजले होते.
1983 सालच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजचे तगडे फलंदाज आणि आग ओकणाऱ्या गोलंदाजीचा सामना करत भारतीय संघाने प्रथमच विश्वविजेतेपद आपल्या नावे केले.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना फक्त 183 धावांवर रोखत वेस्ट इंडीजने विजेतेपदाच्या दृष्टीने पहिले पाउल टाकले होते. पण कपिल देव यांच्या भारतीय संघाने हार मानली नाही.
भारतीय संघाने वेस्ट इंडीज संघाला दिलेले 183 धावांचे आव्हान किरकोळ होते.
पण बलविंदर सिंग संधूंनी गॉर्डन ग्रीनिज यांना फक्त एक धावेवर बाद करत पहिले यश मिळवून दिले. पण याचा विवियन रिचर्डस यांच्यावर कोणताही फरक पडला नाही त्यांनी पुढच्या 28 चेंडूमध्ये 7 चौकार मारत 33 धावा केल्या .
विवियन रिचर्डस यांची ही फलंदाजी पाहुन वेस्ट इंडीज हा सामना एकहाती जिंकेल असे वाटत होते. मात्र कर्णधार कपिल देव यांनी विवियन रिचर्डसनी मिड विकेटवरून मारलेल्या शॉटचा अविस्मरीय झेल घेत करोडो भारतीयांच्या आशा पुन्हा जाग्या केल्या.
विवियन रिचर्डस बाद झाल्यानंतर वेस्ट इंडीज संघाचा नवख्या भारतीय संघासमोर टिकाव लागू शकला नाही.
भारताकडून मदन लाल यांनी आणि मोहिंदर अमरनाथ यांनी प्रत्येकी तीन बळी, बलविंदर सिंग संधू यांनी दोन बळी आणि कपिल देव आणि रॉजर बिन्नी यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
मोहिंदर अमरनाथ यांच्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्यांना सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.
1983च्या विश्वचषकनंतर भारतीय संघाने 2011 साली भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाचे दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले होते.
https://twitter.com/HomeOfCricket/status/1011142196899254272






