-प्रणाली कोद्रे
१८ व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतरही कुटुंबाला अर्थिक सहाय्य मिळावे म्हणून क्रिकेट सोडून कॅनडाला जाऊन ट्रक ड्राईव्हर बनण्याचा विचार त्याने केला होता. पण अचानक त्याची २००१ ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली. त्यानेही आलेली संधी दोन्ही हातांनी घट्ट पकडत त्या ३ सामन्यांच्या मालिकेत तब्बल ३२ विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रवासात कधीच मागे वळुन पाहिले नाही. तो क्रिकेटपटू म्हणजे आज भारताचा सर्वात यशस्वी फिरकीपटूंमध्ये गणला जाणारा हरभजन सिंग उर्फ ‘भज्जी’.
याच हरभजनने २४ डिसेंबर २०२१ रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. हरभजनच्या निवृत्तीसह भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ समजल्या जाणाऱ्या १९९९ ते २०१२ या काळातील सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत.
३ जूलै १९८० ला पंजाबमधील जलंधरमध्ये जन्म झालेल्या भज्जीला ५ बहिणी होत्या. त्याने लहानपणापासून कौटुंबिक व्यावसाय सांभाळायचा असेच ठरवले होते. परंतू त्याच्या वडीलांनी त्याला क्रिकेटसाठी पाठिंबा दिला. त्यामुळे भज्जीने क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. भज्जीने सुरुवातीला चरणजीत सिंग भुल्लर यांच्याकडून प्रशिक्षण घेतेले. त्याने त्यांच्याकडून एक फलंदाज म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. परंतू नंतर देविंद्र अरोरा यांनी त्याला फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे भज्जी फिरकीपटू झाला. भज्जी त्यांच्याकडे रोज सकाळी ३ तास आण दुपारी ३ असा सराव करु लागला.
भज्जीने काही दिवसातच वयाच्या १५ व्या वर्षी पंजाबच्या १६ वर्षांखालील संघात स्थान मिळवले. त्याने त्याच्या पहिल्याच सामन्यात हरियाणाविरुद्ध १२ विकेट्स मिळवल्या. त्यापुढील काही सामन्यांमध्येही त्याची कामगिरी चांगली झाली. त्यामुळे त्याला १६ वर्षांखालील उत्तर विभागीय संघात संधी मिळाली. त्यानंतर काही महिन्यातच त्याची भारताच्या १९ वर्षांखालील संघातही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी निवड झाली. या दरम्यान हरभजन देशांतर्गत क्रिकेट गाजवत होता. त्याने १९ वर्षांखालील पंजाब संघाकडून दमदार कामगिरी केल्यानंतर त्याला १९९७ ला रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याने सर्व्हिसेस विरुद्ध रणजी पदार्पण करताना पहिल्याच डावात ३ विकेट्स घेतल्या. पुढे त्याची निवड दुलिप ट्रॉफीसाठीही उत्तर विभागीय संघात झाली. त्याला १९९८ ला १९ वर्षांखालील भारतीय संघाकडून विश्वचषकात खेळण्याचीही संधी मिळाली. त्यावेळी केनियाविरुद्ध त्याने ५ धावात ३ विकेट्स घेतल्या. तसेच संपूर्ण स्पर्धेत त्याला ८ विकेट्स घेता आल्या.
पुढे लगेचच त्याला १९९८ ला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वरिष्ठ भारतीय संघात संधी मिळाली. या मालिकेतील बंगळुरुला झालेल्या कसोटी सामन्यातून त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले. त्याने पदार्पणात ४ आणि ० धावा केल्या. तर १३६ धावा देत २ विकेट्स घेतल्या. यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या तिरंगी वनडे मालिकेत त्याला संधी मिळाली नाही. पण नंतर एप्रिल १९९८ ला त्याने न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या वनडे सामन्यातून वनडे पदार्पण केले. या सामन्यात त्याने १ विकेट घेतली. पुढे काही सामने तो भारताकडून खेळला.
मात्र २०००च्या दरम्यान त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले. याचदरम्यान त्याच्या वडीलांचे निधन झाले. त्यामुळे घरातील एकटा मुलगा असल्याने सर्व जबाबदारी त्याच्यावर आली. एकावेळी त्याने कॅनडाला जाऊन ट्रक ड्राईव्हर होण्याचाही विचार केला. त्याच्यासाठी ही वर्ष निराशाजनक ठरले. याचकाळात मुरली कार्तिकने पदार्पण केले. त्यामुळे हरभजनच्या पुनरागमनाच्या आशा धूसर व्हायला लागल्या. पण २००१ ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेआधी अनिल कुंबळे दुखापतग्रस्त झाला आणि हरभजनला संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत हरभजनने ३ सामन्यात ३२ विकेट्स घेतल्या. द्रविड-लक्ष्मणच्या भागीदारीमुळे प्रसिद्ध असलेल्या कोलकाता कसोटीत हरभजनने एकूण १३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यात त्याच्या हॅट्रिकचाही समावेश आहे. त्याने त्या सामन्यात पहिल्या डावात पॉन्टिंग, ऍडम गिलख्रिस्ट, शेन वॉर्न यांना सलग बाद केलं होतं. त्यावेळी तो कसोटीत हॅट्रिक घेणारा भारताचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला होता.
यानंतर हरभजन भारताच्या संघातील नियमित सदस्य बनला. तो आणि अनिल कुंबळेची जोडी घातक ठरायला लागली. त्यात सुरुवातीपासून २०१०च्या दशकाच्या बलाढ्या ऑस्ट्रेलिया संघाला हरभजन नडायला लागला. तो त्यांनी केलेले स्लेजिंगचे जशास तसे उत्तर देऊ लागला. एकदा तर बंगलोरला कसोटी सामन्यात तो फलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण करत असलेला डॅरेन लेहमन त्याला सातत्याने काहीतरही बोलून डिवचत होता. त्यावेळी हरभजनने लेहमनकडे पाहिले आणि त्याच्या पोटाकडे पाहून तो त्याला सरळ म्हणाला, ‘तू प्रेग्नंट आहेस का?’ हरभजनचे असे विचित्र वाक्य ऐकून नंतर लेहमन काही बोलला नाही. हरभजनचे जशास तसे बोलणे आणि मग त्वेषाने खेळणे पाहून मॅग्राही म्हणाला होता की त्याला डिवचलं की तो जास्त चांगला खेळतो, त्यामुळे आता त्याला जास्त स्लेज करण्यात अर्थ नाही.
हरभजन कोणालाही ऐकत नसे. तो आपल्या मस्तीत रहायचा. एकदा तर लिफ्टमध्ये तो आणि सचिन तेंडूलकर असताना एक व्यक्ती आला आणि त्याने सचिनला पाहुन म्हटले की ‘गॉड ऑफ क्रिकेट’ तूम्हाला भेटून छान वाटले…त्यावर हरभजन त्याला म्हणाला, हा आणि मी ‘डॉग ऑफ क्रिकेट’.
असे असले तरी भज्जीची भारताकडून कामगिरी चांगली होत होती. त्याची हीच कामगिरी पाहून २००२ ला पंजाब सरकारने त्याला मानद पंजाब पोलिस उपअधीक्षकपद बहाल केले. त्यावेळीचे पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी त्याला ‘पंजाब का पुत्तर’ असे नावही दिले.
हरभजनच्या ‘भज्जी’ या टोपननावामागेही एक गमतीदार किस्सा आहे. झाले असे की हरभजनच्या सुरुवातीच्या दिवसात यष्टीरक्षण करणाऱ्या नयन मुंगीयाला गोलंदाजी करणाऱ्या हरभजनला प्रोत्साहन देण्यासाठी आवाज द्यायचा असायचा. पण हरभजन हे नाव खूप मोठे वाटत असल्याने त्याने त्याला भज्जी नावाने हाक मारायला सुरुवात केली. पुढे हरभजनचे ‘भज्जी’ हे टोपन नाव प्रसिद्ध झाले.
भज्जी तसा बिंधास्त खेळाडू जे मनात येईल ते करणारा. कधीकधी बेशिस्त वागणारा पण गोलंदाजी करताना त्यात जीव ओतणारा. त्याचमुळे गांगुलीने कर्णधार असताना मस्तीखोर असले तरी मेहनती आणि प्रतिभाशी असणाऱ्या भज्जी, युवी यांसारख्या खेळाडूंना भारतीय संघात बांधून ठेवले होते. पण एकदा गांगुलीलाच त्यांची मस्ती नडली होती. किस्सा गमतीचाच आहे, पण गांगुलीच्या डोळ्यात मात्र पाणी आणणारा आहे. एकदा १ एप्रिलला भज्जी, युवी, झहिर यांनी द्रविड, सचिन यांसारख्या दिग्गज खेळाडूंसह एक प्लॅन केला होता. त्यांनी विविध भाषेतील वृत्तपत्रांचे कटिंग गांगुली आल्यानंतर त्याला दिली. त्या वृत्तपत्राच्या कटिंगमध्ये गांगुलीची मुलाखत छापलेली होती आणि त्यात गांगुलीने युवी, हरभजन यांच्यावर टिका केली असल्याचे दिले होते. त्यामुळे हे खेळाडू ते कटिंग गांगुलीला दाखवत त्याच्यावर प्रचंड चिडले. न खेळण्याचीही धमकी त्यांनी दिली. सचिन, द्रविडनेही गांगुलीला हे काही बरोबर नाही असे दाखवले. गांगुलीला काही कळेना, तो त्यांना समजावत होता की मी अशी कोणतीही मुलाखत दिलेली नाही, तूम्हाला जर असे वाटत असेल तर मी कर्णधारपदही सोडतो. पण अखेर गांगुली हताश झाल्यावर द्रविडने त्याला विचारले असे आज तारिख काय आहे, तूला एप्रिल फूल केले आहे. ते कटिंग खोटे आहेत. तेव्हा कुठे गांगुलीचा जीव भांड्यात पडला.
२००२ ला नेटवेस्ट सिरिजच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्यानंतर जेव्हा गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीत उभे राहुन जर्सी काढून फिरवली होती तेव्हा हरभजनही तसे करायला निघाला होता. पण त्यावेळी अन्य भारतीय खेळाडूंनी त्याला रोखलं.
असो, सुरुवातीपासूनच मस्तीखोर असणाऱ्या हरभजनने २००१नंतर हळुहळु भारतीय संघाकडून कुंबळेबरोबर चमकदार कामगिरी करणं सुरु ठेवलं होतं. त्याने २००२ चॅम्पियन्स ट्रॉफी, २००३ विश्वचषक अशा स्पर्धेतही चांगली कामगिरी केली. पण यानंतर ग्रेग चॅपेल भारतीय संघाचे प्रशिक्षक झाल्यावर आणि गांगुली-चॅपेल वाद झाल्यावर हरभजननेही चॅपेल यांच्यावर टिका केली. त्याचा परिणाम म्हणून त्याला माफीही मागावी लागली. त्यात २००६ दरम्यान हरभजनला विकेट्स घेण्यात अपयश यायला आहे. हे वर्ष त्याच्यासाठी संघर्षपूर्ण ठरले. तो संघाच्या आत-बाहेर होत राहिला. पण त्यानंतर २००७ ला झालेल्या टी२० विश्वचषकात हरभजनची निवड झाली आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याने ७ सामन्यात ७ विकेट्स घेतल्या.
पण पुन्हा हरभजनसाठी २००८ वर्षात कारकिर्दीत वादळ निर्माण करणारं ठरलं. त्यावर्षी त्याच्यात आणि ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंडमधील मंकीगेट प्रकरण भलतचं रंगल. आयसीसीने हरभजनवर सायमंडशी असभ्य भाषेत बोलण्याबद्दल बंदी घातली. पण भारतीय खेळाडूंनी बीसीसीआयसह असे असेल तर आम्ही मालिकेतून माघार घेऊ ही धमकी दिली. त्यामुळे ही बंदी नंतर आयसीसीने उठवली. त्याचवर्षी पहिल्याच आयपीएल मोसमात हरभजनने श्रीसंतच्या कानाखाली मारली. त्यामुळे त्याच्यावर पहिल्या आयपीएल मोसमात खेळाण्यासाठी बंदी घालण्यात आली. पण या वादग्रस्त ठरलेल्या वर्षानंतर हरभजनने भारतीय संघात चांगले पुनरागमन केले. त्याने जूलै २००८ ला श्रीलंकेविरुद्ध गॉलला झालेल्या कसोटी सामन्यात १० विकेट्स घेत ही कसोटी मालिका भारताला बरोबरीत सोडवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. यादरम्यान भारतीय संघाला कसोटीत अव्वल क्रमांक मिळवून देण्यातही हरभजनचा मोठा वाटा होता. २०१०ला न्यूझीलंडविरुद्ध खेळताना त्याने कसोटीत सलग २ शतके केली. पुढे त्याने २०११ च्या विश्वचषकातही भारताकडून चांगली कामगिरी केली. त्याला २००७ च्या पहिल्या टी२० विश्वचषक विजेत्या तसेच २०११ च्या वनडे विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग असण्याचेही भाग्य लाभले.
या विश्वचषकानंतर जूलैमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळताना त्याने कसोटी कारकिर्दीत ४०० विकेट्सचा टप्पाही पार केला. त्यावेळी तो कसोटीत ४०० विकेट्स घेणारा केवळ तिसरा भारतीय गोलंदाज ठरला होता. त्यानंतर मात्र त्याची कामगिरी खालवली. जूलै-ऑगस्ट २०११ ला झालेल्या इंग्लंड दौऱ्यात पहिल्या २ कसोटीत त्याला खास काही करता आले नाही. त्यानंतर तो पोटाच्या दुखापतीमुळे या दौऱ्यातून बाहेर पडला. त्यानंतर २०११ च्या शेवटी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून त्याला वगळण्यात आले. याचदरम्यान आर आश्विन हा उदोन्मुख फिरकी गोलंदाज भारताला सापडला. त्यामुळे २०११ नंतर हरभजन केवळ ५ कसोटी सामने खेळू शकला. तर वनडेमध्येही त्याला २०११ नंतर थेट २०१५ मध्ये संधी मिळाली. पण त्यातही तो २०१५ ला ७ वनडे सामने खेळला. ३ मार्च २०१६ ला तो युएईविरुद्ध शेवटचा टी२० सामना भारताकडून खेळला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा संधी मिळाली नसली तरी भज्जी आयपीएल गाजवत राहिला. २०२० च्या आयपीएल मोसमासाठीही तो चेन्नई सुपर किंग्सच्या संघात आहे. त्याचा ३ वेळा आयपीएल विजेत्या मुंबई संघात तर १ वेळा आयपीएल विजेत्या चेन्नई संघात समावेश होता.
२०१६ नंतर हरभजनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम लागला असला तरी हरभजनने त्याच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले. त्याने अनेकदा संघर्ष केला. अनेकदा वाद झाले, अवैध गोलंदाजीमुळे बंदी आली. मात्र त्याने प्रत्येकवेळी नव्याने उभा राहिला. त्याचमुळे आजही आणि पुढेही भारताचा एक सर्वोत्तम फिरकीपटू म्हणून ओळखला जाईल.
गोष्ट एका क्रिकेटरची मालिकेतील अन्य लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण