-प्रणाली कोद्रे ([email protected])
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघाला समोर पहाताच त्याला काय व्हायचं माहित नाही, पण त्याची कामगिरी इतकी बहरायची की त्याच्या इन स्विंगरवर अनेक दिग्गज फलंदाजांना त्याने संघर्ष करायला लावला होता. त्याची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट होती ऑस्ट्रेलियाचा महान सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडन. तो क्रिकेटपटू म्हणजे इरफान पठाण. २७ ऑक्टोबर १९८४ ला जन्मलेला इरफान लहानाचा मोठा झाला तो जुम्मा मस्जिदमध्ये. इरफानच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी हालाकीचीच होती. त्यामुळे तो त्याच्या कुटुंबासह जुम्मा मस्जिदच्या जवळ रहायचा. इथेच त्याने मोठा भाऊ युसुफसह क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पण दोन्ही पठाण बंधूंना क्रिकेटची गोडी लावली ती त्यांचा मामा अहमद मियाँने. त्यांनी पठाण बंधूंना त्यांची पहिली बॅट घेऊन दिली होती आणि त्यांनीच मेहदी शेख या पठाण बंधूच्या प्रशिक्षकांशी त्यांची गाठ घालून दिली होती. त्यावेळी अनेकदा क्रिकेट साहित्य पुरेसे पैसे नसल्याने पठाण बंधूंनी पुन्हा पुन्हा दुरुस्त करुन वापरले. एकदा तर इरफानने संक्रांतीच्या काळात पतंगही विकले होते.
इरफान युसुफसह मस्जिदमध्येच क्रिकेट खेळत असताना अनेक जण त्यांची तक्रार त्यांच्या वडीलांकडे करायचे. त्यामुळे जवळजवळ रोजच त्यांच्या वडिलांना नियमित मस्जिदमध्ये येणाऱ्या लोकांची माफी मागायला लागायची. पण तरीही या दोघांचे क्रिकेटबद्दलचे प्रेम कमी झाले नाही. पुढे इरफानला भारचाचे माजी कर्णधार दत्ता गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर काही दिवसातच इरफानने बडोद्याच्या वयोगटाच्या क्रिकेट संघात स्थान मिळवले. तो १३ वर्षांचा असतानाच तो १६ वर्षांखालील बडोदा संघाकडून खेळत होता. वयोगटातील क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करताच तो जेमतेम १७ वर्षांचा असताना त्याने बडोद्याच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवले. त्यावेळी झहिर खान भारताकडून खेळण्यासाठी गेला असताना त्याला बडोद्याकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याने केवळ ५ रणजी सामन्यातच १५ विकेट्स घेतल्या.
पुढे जाऊन इरफानने १९ वर्षांखालील भारतीय संघाचेही प्रतिनिधित्व केले. त्याने १९ वर्षाँखालील संघाकडून खेळताना १३ सामन्यात २८ विकेट्स घेतल्या. त्याची डेनिस लिली यांच्या मदतीने चन्नईत स्थापन झालेल्या एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये निवड झाली. त्याने २००२-०३ या मोसमात केलेल्या देशांतर्गत स्पर्धेतील आणि १९ वर्षांखालील संघाकडून केलेली प्रभावी कामगिरी पहाता त्याला १९ व्या वर्षीच भारताच्या वरिष्ठ संघातही स्थान त्याला मिळाले. त्याने त्या मोसमात दुलीप ट्रॉफीमध्ये २२ विकेट्स आणि ४६ धावा केल्या होत्या. सर्वकाही स्वप्नवत सुरु होते. पण इरफानचे आंतरराष्ट्रीय पदार्पणही काही खास झाले नाही. त्याने डिसेंबर २००३ ला ऍडलेडमध्ये त्यावेळच्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करताना हेडनची विकेट घेतली. पण त्याने जवळजवळ प्रत्येक षटकामागे ५ धावा दिल्या. त्यामुळे पुढच्या सामन्यात झहिर खान पुन्हा भारतीय संघात आल्याने त्याला वगळले गेले.
पण झहिरला याच मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दुखापत झाल्याने पुन्हा सिडनी कसोटीसाठी इरफानला संधी मिळाली. ही संधी मात्र इरफानला हातची घालवायची नव्हती. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट तो घेणार होता आणि त्याने ते घेतलेही. त्याने या सामन्यात स्टिव्ह वॉ आणि ऍडम गिलख्रिस्टला पहिल्या डावात बाद करत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तयार असल्याचे दाखवून दिले. याच सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने रिकी पाँटिंगची विकेट घेतली. तेव्हापासून इरफान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वैर सुरु झाले ते कायमचेच. याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात इरफानने वनडे पदार्पणही केले. या दौऱ्यादरम्यान एकदा दरवाज्यांना सेन्सॉर असल्याची गंमत वाटल्याने आतबाहेर करणाऱ्या इरफानचा त्यावेळी चूकून स्टिव्ह वॉला धक्का लागला होता. त्यावेळी स्टिव्ह वॉला इरफान त्याची खेचतोय असे वाटल्याने तो त्याला म्हणाला होता, इरफान आता बास कर तू मला आधीच खूप त्रास दिला आहेस. पण तेव्हा एवढं इंग्लिश इरफानला झेपलंच नाही, त्यामुळे तो कसलंच स्पष्टीकरण न देता तिथून निघून गेला. याबद्दल इरफानने एका मुलाखतीत खूलासा केला होता.
पुढे इरफानची निवड २००४ च्या पाकिस्तान दौऱ्यासाठी झाली. हा दौरा इरफानला ओळख मिळवून देणारा ठरला. त्याने या दौऱ्यातील कसोटी मालिकेत केवळ ३ सामन्यात १२ विकेट्स घेतल्या. वनडे मालिकेतील ३ सामन्यात ८ विकेट्स घेत त्याचे नाणे खणखणीत वाजवले. त्याचवेळीचा एक गमतीशीर किस्सा असा की वेगवान गोलंदाज असल्याने भरपूर खाण्याची सवय असलेला इरफान कसोटी सामन्याआधी जेवण करत होता. त्यावेळी भारताला गोलंदाजीसाठी जायचे होते. पण त्याआधी इरफानचे भरलेले ताट पाहून सचिन त्याची खेचायची म्हणून त्याला म्हणाला आता आपल्याला फलंदाजीला जायचे आहे ना? त्यावर इरफान म्हणाला नाही गोलंदाजी. यावर सचिन त्याच्या ताटाकडे पाहून म्हणाला, मला वाटले फलंदाजीला जायचे आहे. इरफान सांगतो तेव्हापासून तो आणि सचिन जेवताना कधी जवळ बसले नाहीत.
इरफानची आंतरराष्ट्रीय कारकिर्द सुरु असतानाचाच आणखी एक मजेदार किस्सा असा की इरफानच्या घरची बिर्याणी भारतीय संघात प्रसिद्ध होती. एकदा २००७ मध्ये भारतीय संघातील सगळे सदस्य बिर्याणी खाण्यासाठी पठाण बंधूच्या घरी गेले होते. तेव्हा सर्वांनी बिर्याणीवर मस्त ताव मारला होता. एवढेच नाही तर दुसऱ्या दिवशी सचिनने इरफानला आदल्यादिवशीची बिर्याणी उरली आहे का असे देखील विचारले होते.
असो २००४ च्या पाकिस्तान दौऱ्यानंतर हळुहळु इरफान भारतीय संघाचा नियमित सदस्य बनला. एव्हाना गांगुलीने कर्णधारपद सोडले आणि द्रविडने नेतृत्वाची धूरा हाती घेतली होती. त्यावेळी भारताचे प्रशिक्षक असणाऱ्या ग्रेग चॅपेल यांना इरफानमधील अष्टपैलू क्रिकेटपटू सापडला आणि त्यांना त्याला फलंदाजीच्या फळीत बढती दिली. काही दिवसांसाठी इरफानला कपिल देव नंतरचा भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ओळख मिळाली असली तरी कदाचित कुठेतरी त्याला याच गोष्टीचा फटका बसला.
इरफानने ऑक्टोबर २००५ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ८३ धावांची खेळीही केली. त्यानंतर डिसेंबर २००५मध्ये श्रीलंकेविरुद्ध आजारी पडलेल्या विरेंद्र सेहवाग ऐवजी दुसऱ्या डावात सलामीला फलंदाजी करताना तब्बल ९३ धावांची खेळी केली होती.
त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम दिवस उजाडला तो २००६ मध्ये 29 जानेवारीला. त्याने कराची येथे पाकिस्तान विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच षटकातील चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूंवर विकेट्स घेत हॅट्रिक साजरी केली होती. त्याने सलमान बट, युनुस खान, मोहम्मद युसुफला बाद करत पाकिस्तानला मोठे धक्के दिले होते. पाकिस्तानने नंतर हा सामना जिंकला ती गोष्ट वेगळी. पण पाकिस्तानचा संघ म्हटलं की चेकाळणाऱ्या इरफानने घेतलेल्या त्या हॅट्रिकने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. तो त्यावेळी हरभजननंतर हॅट्रिक घेणारा भारताचा दुसराच गोलंदाज होता. याच मालिकेतील कराची आधी फैसलाबाद येथे झालेल्या कसोटी सामन्यात इरफानने फलंदाजी करताना कमाल केली होती. या सामन्यात इरफानने एमएस धोनीला साथ देताना ६ व्या विकेटसाठी २१० धावांची भागीदारी रचली होती. त्यावेळी इरफानने ९० धावांची खेळी केली होती.
इरफान २००४ ते २००६ या काळात यशाच्या शिखरावर होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत आयसीसीच्या वनडे क्रमवारीत अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत दुसरा, तर कसोटी क्रमवारीत पहिल्या ५ खेळाडूंमध्येही स्थान मिळवले होते. २००४ मध्ये त्याला आयसीसीचा सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कारही मिळाला होता.
पण २००६ च्या शेवटी शेवटी त्याला संघर्ष करावा लागला. त्याचे फलंदाजीकडे लक्ष देताना गोलंदाजीकडे दुर्लक्ष झाले. पर्यायाने त्याला वनडे आणि कसोटी संघातील स्थान गमवावे लागले. अखेर त्याने पुन्हा २००७ च्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवले. या स्पर्धेत त्याने फक्त पुनरागमनच केले नाही तर त्याने भारताला हा विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटाही उचलला. त्याने या स्पर्धेत १० विकेट्स घेताना अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही मिळवला. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून वनडे संघातही पुनरागमन केले. पुढे त्याने बंगळुरु येथे पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून कसोटीतील पहिले शतक झळकावताना तो परत आल्याची पावती दिली. याच कामगिरीमुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही भारतीय संघात निवडले गेले. त्या दौऱ्यात त्याने पर्थला झालेल्या सामन्यात ५ विकेट्स आणि २८व ४६ धावांची खेळी करताना भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलत सामनावीराचा पुरस्कार मिळवला. पण यानंतर इरफान केवळ २ कसोटी सामने खेळू शकला.
एप्रिल २००८मध्ये तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला. त्यावेळी त्याचे वय होते केवळ २३ वर्षे. यानंतर ऑक्टोबर २०१२ ला त्याने भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. ज्या वयात एखादा क्रिकेटपटू भरात येतो, एखादा क्रिकेटपटू पदार्पण करतो त्याच वयात इरफानची आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपली होती. सुरुवातीला दोनी बाजूंनी स्विंग करणारा प्रभावी गोलंदाज असणाऱ्या इरफानची अष्टपैलू क्रिकेटपटू बनण्याच्या नादात लय हरवली. परिणामी त्याला संघातील जागाही गमवावी लागली. पुढे भारताला अष्टपैलू क्रिकेटपटू मिळत गेल्याने इरफानला पुनरागमन करणे अशक्य झाले.
केवळ २९ कसोटी, १२० वनडे आणि २४ टी२० सामने खेळताना इरफानने तब्बल ३०१ विकेट्स घेतल्या. ज्यावेळी इरफानने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा हा खेळाडू लंबी रेस का घोडा वाटत असतानाच अर्ध्यातच त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रवासाला पूर्णविराम लागला. २००७ ला टी२० विश्वचषक भारताला जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या इरफानला २०११ च्या विश्वचषकातही जागा मिळवता आली नाही. या दरम्यान त्याच्यानंतर काही वर्षांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा त्याचा मोठा भाऊ युसुफला मात्र दोन विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग होता आले. पण हे भाग्य इरफानला मिळाले नाही. पण असे असले तरी या दोन भावांमधील प्रेम कधी कमी झाले नाही.
त्यातच इरफानची देशांतर्गत क्रिकेटमधलीही लय हरवली. अखेर बडोदा संघातूनही त्याला वगळले गेले. त्यामुळे इरफानने जम्मू आणि काश्मिर संघाकडून खेळायला सुरुवात केली. यावेळी त्याने जम्मू आणि काश्मिर संघाचे मार्गदर्शक म्हणूनही काम पाहिले. एवढेच नाही तर त्याने जम्मू -काश्मिर संघाला पुढे आणण्यासाठी खूप प्रयत्न देखील त्यावेळी केले. तो तिथे जाऊन युवा खेळाडूंशी चर्चा करायचा. याच जम्मू आणि काश्मिर संघाने २०१९-२० च्या रणजी मोसमात अंतिम ८ संघात स्थान मिळवले.
या दरम्यान तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली डेअरडेविल्स, किंग्स इलेव्हन पंजाब अशा संघाकडून खेळला. त्याने २०१७ पर्यंत आयपीएल खेळताना १०३ सामन्यात ११३९ धावा आणि ८० विकेट्स काढल्या. मात्र त्यानंतर कोणत्याही संघाने त्याला खरेदी करण्यास पसंती दाखवली नाही.
Happy Birthday @IrfanPathan ????????
Here's reliving his famous hat-trick against Pakistan. This one's from the archives #TeamIndia pic.twitter.com/CG3sV47aDU— BCCI (@BCCI) October 27, 2018
अखेर इरफानने यावर्षी जानेवारीमध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या इरफान समालोचन करताना दिसतो. कदाचित त्याने आता हिच त्याची पुढील कारकिर्द म्हणून स्विकारले असावे. पण अखेर मनातील सल त्याने निवृत्ती घेताना बोलून दाखवली. तो म्हणाला, ‘२७ वर्षांचा असताना मी ३०१ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतले होते. परंतु माझी कारकीर्द तिथेच संपुष्टात आली होती. मी जर अजून खेळलो असतो तरी माझ्या विकेट्सची संख्या ५००-६०० पर्यंत गेली असती. पण खेळण्याची संधी मिळाली नाही. मला याचं दु:ख आहे.’ त्यावेळी एका गुणी आणि प्रभावी क्रिकेटपटूची कारकिर्द अशा प्रकारे संपू नये अशीच अनेकांची भावना होती.
याच लेखमालेतील अन्य लेख-