अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर 5 ऑक्टोबरपासून तेराव्या वनडे विश्वचषकाला सुरुवात होईल. यंदा यजमान भारतीय संघ विजेतेपदाचा सर्वात प्रबळ दावेदार आहे. आतापर्यंत झालेल्या बारा विश्वचषकात दोन वेळा भारतीय संघ ही ट्रॉफी उंचावण्यात यशस्वी ठरलाय. मात्र, भारतात क्रिकेटला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून देणारी जी घटना झाली ती म्हणजे 1983 विश्वचषक. भारत प्रथमच विश्वविजेता झाला आणि भारतातील क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला. त्याचीच ही कहाणी…
पहिल्या दोन वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने फक्त हजेरी लावण्याचे काम केले होते. सलग तिसऱ्यांदा इंग्लंडने 1983 मध्ये वर्ल्डकपचे आयोजन केले. यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व होते 24 वर्षाच्या कपिल देव यांच्या हाती. पहिल्या दोन वर्ल्डकपप्रमाणे यावेळी देखील भारत लीग राऊंडच्या पुढे जाणार नाही, असेच अनेक जण म्हणत होते. मात्र, भारतीय संघाने वेगळाच काहीतरी विचार केलेला.
भारतीय संघाने वर्ल्डकपची सुरुवातच अत्यंत धमाकेदार केली. ओल्ड ट्रॅफर्डवर मागील दोनही वर्ल्ड कप जिंकलेल्या वेस्ट इंडीजला लोळवून त्यांनी अफरातफरी माजवली. त्यानंतर झिम्बाब्वेला एकतर्फी हरवले. ऑस्ट्रेलियाने भारताची विजयाची हॅट्रिक होऊ दिली नाही व तब्बल 162 धावांनी विजय मिळवला. त्यावेळी डबल राउंड रॉबिन पद्धत असल्याने याच तीनही संघांविरुद्ध भारत पुन्हा एकदा खेळणार होता.
दुसऱ्या राउंडमध्ये वेस्ट इंडीजने आपल्या पहिल्या पराभवाचा बदला घेत भारताला हरवले. झिम्बाब्वेविरुद्ध भारताला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता. भारत 5 बाद 17 अशा अत्यंत नाजूक परिस्थितीत असताना, कपिल देव (Kapil Dev) यांनी ऐतिहासिक अशी 175 धावांची खेळी करून भारताला त्या सामन्यात वापसी करून दिली आणि नंतर विजयही मिळवून दिला. शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे आव्हान मोडीत काढून भारताने प्रथमच वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये जागा मिळवली.
सेमी-फायनलमध्ये टीम इंडियासमोर यजमान इंग्लंडचे आव्हान होते. संपूर्ण मीडिया आणि लोक भारताच्या विरोधात असताना भारतीय संघाने इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर धूळ चारत दिमाखात फायनल गाठली. फायनलमध्ये वर्ल्डकप विजयाची हॅट्रिक करण्यासाठी वेस्टइंडीज सज्ज होता. भारतही पहिल्यांदा फलंदाजी करताना फक्त 183 पर्यंत मजल मारू शकलेला. मात्र, आज इतिहास घडवायचाच या इराद्याने मैदानात उतरलेल्या भारतीयांना कोणीही रोखणार नव्हतं.
📅 #OnThisDay in 1983, 📍 Lord's – History created! #TeamIndia led by @therealkapildev won the World Cup after beating the mighty West Indies 🏆#TeamIndia 🇮🇳 pic.twitter.com/fKfhICVs5R
— BCCI (@BCCI) June 25, 2020
श्रीकांत-मोहिंदर अमरनाथ यांची बॅटिंग, अमरनाथ आणि मदनलाल यांची किफायतशीर बॉलिंग याच बरोबर कॅप्टन कपिल देव यांनी न भूतो असा विव रिचर्ड्स यांचा टिपलेला तो नेत्रदीपक झेल यामुळे भारताचे विश्वविजयाचे स्वप्न साकार झाले. इतकेच नव्हे तर 25 जून 1983 या दिवशी भारतात क्रिकेटचा पुनर्जन्म झाला असेच म्हणावे लागेल. (Story of Team India’s First World Cup 1983 Victory)
हेही वाचा-
‘दररोज हैदराबादी बिर्याणी खाऊन…’, ऑस्ट्रेलियाविरुद्ध हारल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान चर्चेत
‘हे’ 3 धुरंधर भारतीय संघाला बनवू शकतात वर्ल्डकप चॅम्पियन, पुन्हा एकदा होणार स्वप्न साकार!