बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 स्पर्धेत भारतीय संघाच्या ताफ्यात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएस भरत याला सामील करण्यात आले होते. रिषभ पंत अपघातात दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याच्या जागी भरतला संधी मिळाली होती. त्याने संपूर्ण मालिकेत 101 धावा चोपल्या. तसेच, यष्टीमागे काही झेलही सोडले. त्यामुळे त्याला आता सोशल मीडियावर दुखापतींचा सामना करावा लागला. अशातच आता कसोटी मालिकेनंतर सुनील गावसकर यांना प्रश्न विचारण्यात आला की, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून कोणाला संधी दिली पाहिजे? यावर त्यांनी काय उत्तर दिले, चला जाणून घेऊयात…
भरतला अंतिम अकरामध्ये पाहू इच्छित नाहीत गावसकर
खरं तर, भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या (World Test Championship 2023) अंतिम सामन्याचे तिकीट पक्के केले आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे माजी दिग्गज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मोठे भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले आहे की, डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघासाठी यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका कुणी साकारली पाहिजे.
गावसकरांनी म्हटले की, डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात केएल राहुल (KL Rahul) याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान दिले पाहिजे. ते म्हणाले की, “तुम्ही केएल राहुल याला एक यष्टीरक्षकाच्या रूपात पाहू शकता. जर तो ओव्हलमध्ये पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, तर आपली फलंदाजी मजबूत होईल. कारण, त्याने मागील वर्षी इंग्लंडमध्ये वास्तवात चांगली कामगिरी केली होती. त्याने शतकही केले होते. जेव्हा तुम्ही डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी आपले अंतिम अकरा खेळाडू निवडाल, तेव्हा राहुलला लक्षात ठेवा.”
राहुलला डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सामील केले गेले, तर हे स्पष्ट होईल की, केएस भरत (KS Bharat) याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळणार नाही.
‘केएल राहुल आणि ईशान किशन भरतपेक्षा चांगले’
यासोबतच यष्टीरक्षक भरतच्या प्रदर्शनाची चर्चा करताना गावसकर म्हणाले की, राहुलला फक्त एका कसोटीसाठी निवडणे भारतीय फलंदाजी क्रमाला खोली प्रदान करेल. ते म्हणाले की, “दिनेश कार्तिक याने समालोचनादरम्यान भरतच्या यष्टीरक्षणातील कमतरता सांगितल्या होत्या. एका यष्टीरक्षकाची खरी परीक्षा अशा खेळपट्ट्यांवर होते, जिथे चेंडू वळत असतो. तुम्ही ट्रेविस हेड हा ज्याप्रकारे बाद झाला, ते पाहू शकता. जेव्हा चेंडू वळण घेऊन स्टंपला लागला, केएस भरतचे ग्लोव्हज कुठेच चेंडूच्या जवळ नव्हते. त्याचा अर्थ असा की, चेंडू जर स्टंपला लागला नसता, तर विरोधी संघाला चार धावा मिळाल्या असत्या. हे खरंच चिंतेची बाब आहे. आता त्याला अंतिम अकरात घ्यायचे की नाही, हे निवड समितीवर आहे. मात्र, इंग्लंडमध्ये अशा खेळपट्ट्या नसतात, जिथे यष्टीरक्षकाला जवळ येऊन थांबावे लागेल. अशा परिस्थितीत तुम्ही केएल राहुल याला यष्टीरक्षक म्हणून निवडू शकता. तसेच, इथे ईशान किशन याच्या नावावरही विचार करू शकता. त्याची फलंदाजी भरतपेक्षा चांगलीच असेल.”
डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 7 ते 11 जून रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (Australia vs India) संघात लंडनच्या के ओव्हल मैदानात खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (sunil gavaskar gives advice to rohit sharma said drop ks bharat in wtc final 2023 over kl rahul read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTCच्या फायनलचं तिकीट तर मिळवलं, पण ‘या’ 3 आव्हानांचा सामना कसा करणार टीम इंडिया?
दे घुमा के! 6,6,6…कतारमध्ये घोंगावलं ख्रिस गेल नावाचं वादळ, उभ्या-उभ्याच षटकारांची केली बरसात