विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. अनेक आजी-माजी खेळाडू त्याचे चाहते आहेत. अनेक खेळाडू त्याच्या खेळावरती कायमच वक्तव्य करत असतात. आता दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी कोहलीवर मोठं वक्तव्य केलं आहे.
सुनील गावसकर ‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना म्हणाले की, “जेव्हा विराट कोहलीची कारकीर्द सुरु झाली होती, तेव्हा त्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. मात्र तेव्हा महेंद्र सिंह धोनी कर्णधार होता, ज्यानं विराटला भरपूर साथ दिली. त्याच्यामुळे आज आपण विराट कोहलीला खेळताना बघत आहे.” विशेष म्हणजे, यापूर्वी सुनील गावसकर यांनी विराट कोहलीवर टीका केली आहे.
विराट कोहलीनं या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळलेल्या सामन्यात अर्धशतक झळकावलं होतं. परंतु त्याचा स्ट्राइक रेट 120 पेक्षा सुद्धा कमी राहिला होता, ज्यानंतर गावसकरांनी त्याच्या खेळावर टीका केली होती. गावसकर म्हणाले होते की, “मधल्या षटकांत कोहलीनं त्याची खेळण्याची उर्जा गमावली होती. 31-32 धावांच्या आसपास वाटत होतं की तो बाद होईल. त्यानं मधल्या षटकात एकही बाउंड्री मारली नाही. तुम्ही डावाच्या पहिल्या चेंडूपासून स्ट्राइक घेता आणि 14-15 व्या षटकात बाद होता. त्यावेळी तुमचा स्ट्राइक रेट 118 राहतो. संघाला तुमच्याकडून अशा प्रकारच्या खेळीची अपेक्षा नसते.”
विराट कोहलीनं आयपीएलच्या या हंगामात आरसीबीकडून खेळताना 13 सामन्यांमध्ये सर्वाधिक 661 धावा केल्या आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. त्यानं या हंगामात 5 अर्धशतकं आणि 1 शतक झळकावलंय. आरसीबीला प्लेऑफच्या शर्यतीत जिवंत ठेवण्यात त्याचं मोलाचं योगदान राहिलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं भारतासाठी 113 कसोटी, 292 एकदिवसीय आणि 117 टी20 सामन्यांमध्ये एकूण 26000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या टी20 विश्वचषकात 1141 धावा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार का? हेड कोचच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
2 चेंडूत 2 षटकार खाल्यानंतर ओव्हर पूर्ण न करताच मैदानाबाहेर गेला अर्जुन तेंडुलकर! समोर आलं मोठं कारण