भारतीय क्रिकेट संघाचा अनुभव फलंदाज विराट कोहली हा सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. फलंदाजीतील अनेक विक्रम त्याच्या नावे जमा आहेत. विराट कारकिर्दीच्या अखेरीकडे चालला असतानाही त्याच्या कामगिरीत सातत्य दिसून येते. त्याच्या आतापर्यंतच्या या यशस्वी कारकिर्दीबाबत बोलताना भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने कौतुकाचे शब्द काढले.
रैना व विराट अनेक वर्ष भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजीचे मुख्य आधारस्तंभ होते. त्यांनी एकत्रितरित्या भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले. नुकतेच एका मुलाखतीत बोलताना रैना याला विराटच्या कारकिर्दीबाबत विचारण्यात आले. त्यावेळी त्याचे कौतुक करताना तो म्हणाला,
“विराटचा स्वतःवरील विश्वास हा खूप जबरदस्त आहे. जेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा तो प्रत्येक सामन्याच्या आधी मोठ्या आत्मविश्वासाने आता मला शतक करायचे आहे असे म्हणत. खेळाबद्दलची असलेली ही आत्मीयता आणि स्वतःवरील विश्वास हीच त्याच्या आजवरच्या यशाची किल्ली आहे.”
विराट हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दिसून येतो. तसेच त्याच्या नावे दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके देखील आहेत. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वनडे विश्वचषकात भारतीय संघाला त्याच्याकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
दुसरीकडे रैनाने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. त्यानंतर एक वर्ष आयपीएल खेळून त्याने निवृत्ती जाहीर केली. सध्या तो विदेशातील काही लीगमध्ये खेळण्याबरोबरच समालोचक म्हणून आपली सेकंड इनिंग खेळत आहे. नुकतेच त्याने इंग्लंडमध्ये स्वतःच्या नावाचे एक नवीन रेस्टॉरंट देखील सुरू केलेय.
(Suresh Raina Said Virat Kohli Have Unbelievable Self Belief)