---Advertisement---

बांगलादेश विरुद्ध शानदार कामगिरी करणारे श्रेयस अय्यर, शिवम दुबे आता खेळणार या स्पर्धेत!

On: मंगळवार, नोव्हेंबर 12, 2019 1:52 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध बांगलादेश संघात नुकतीच 3 सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवला. या मालिकेसाठी भारताच्या संघात फलंदाज श्रेयस अय्यर, अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबे आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर या मुंबईकर क्रिकेटपटूंचा समावेश होता.

आता हे खेळाडू या टी20 मालिकेनंतर सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळताना दिसणार आहेत. त्यांचा सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेतील साखळी फेरीच्या अखेरच्या 4 सामन्यांसाठी मुंबईच्या 18 जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

रविवारी नागपुर येथे भारत विरुद्ध बांगलादेश संघात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अय्यरने आक्रमक फलंदाजी करत तर दुबेने शानदार गोलंदाजी करत  भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र शार्दुलला बांगलादेश विरुद्धच्या टी20 मालिकेतील एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.

सध्या भारतात सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत आत्तापर्यंत मुंबईचा संघ अपराजित राहिला आहे. त्यांनी साखळी फेरीत आतापर्यंत मिझोरम, हरियाणा आणि मध्य प्रदेशचा पराभव केला आहे.

मुंबई संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. तसेच काही रिपोर्टनुसार मुंबईचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉवरील बंदी 15 नोव्हेंबरला हटवण्यात येत असल्याने त्याचा 17 नोव्हेंबरला होणाऱ्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यासाठी विचार केला जाऊ शकतो.

असा आहे मुबंईचा संघ-

सूर्य कुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर, आदित्य तारे, सर्फराज खान, जय बिस्टा, सिद्धेश लाड, शिवम दुबे, शुभम रांजणे, शम्स मुलाणी, शार्दुल ठाकुर, धवल कुलकर्णी, कृतीक हेंगेवाडी, परीक्षित वलंगकर, रौनक शर्मा , ध्रुविल मातकर, तुषार देशपांडे, सुजित नायक आणि आतिफ अतरवाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---