येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२१ ची सर्वांचा उत्सुकता लागून आहे. या स्पर्धेतील सर्व सहभागी क्रिकेट बोर्डांनी त्यांचे संघही घोषित केले आहेत. यात अगदी भारतीय संघाचाही समावेश आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या विश्वस्तरीय स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. पारंपारिक विरोधक पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात याच संघातील कोणत्या अंतिम ११ खेळाडूंना संधी मिळेल? याकडे सर्वांचे लक्ष असेल. अशात माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर याने या सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.
गंभीरने आपल्या या संघात युझवेंद्र चहलच्या जागी निवड झालेल्या अनुभवी फिरकीपटू आर अश्विनला स्थान दिलेले नाही. त्यामुळे संघाचे संतुलन मजबूत बनवण्यासाठी त्याला भुवनेश्वर कुमारला निवडावे लागले आहे. तसेच धाकड यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन यालाही त्याने संघाबाहेर ठेवले आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान या कट्टर प्रतिद्वंद्वी संघातील पहिलावहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी दुबईच्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
‘स्टार स्पोर्ट्स’वरील ‘फॉलो द ब्लूज’ या कार्यक्रमावरील एका चर्चा सत्रादरम्यान गंभीरने हा ११ खेळाडूंचा चमू निवडला आहे. त्याने फलंदाजी फळीत सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना जागा दिली आहे. तर कर्णधार विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी ठेवले आहे. कोहलीसोबत सूर्यकुमार यादव, त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांना मधल्या फळीत फलंदाजीसाठी निवडले आहे.
फिरकी गोलंदाजी विभागात रविंद्र जडेजाबरोबर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला संधी दिली आहे. याखेरीज ३ वेगवान गोलंदाजांनाही सामाविष्ट केले आहे. यामध्ये भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.
या टी२० विश्वचषकासाठी निवड समितीने अश्विनवर विश्वास दाखवला आहे. त्याला टी२० विश्वचषकासाठीच्या १५ सदस्यीय संघात जागा मिळाली आहे. त्यामुळे अंतिम ११ मध्येही त्याचे खेळणे जवळजवळ निश्चित दिसत आहे. परंतु तब्बल ४ वर्षांनंतर टी२० स्वरुपात पुनरागमन करणाऱ्या अश्विनबद्दल गंभीरचे वेगळेच मत आहे.
त्याने म्हटले आहे की, “जर माझ्याकडे शार्दुल ठाकूर असता; तर मी त्याला आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी निवडले असते. मग मी वरुण चक्रवर्तीला नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी ठेवले असते. अशावेळी मग मी आर अश्विनसह भुवनेश्वर कुमारलाही वगळले असते आणि मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराहला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवले असते.”
पाकिस्तानविरुद्धच्या टी२० विश्वचषक सामन्यासाठी गौतम गंभीरने निवडलेली भारताची प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णदार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
महत्त्वाच्या बातम्या-
‘महामुकाबल्या’त धोनीला टक्कर देण्यासाठी इशान घेतोय यष्टीरक्षणाची ‘स्पेशल ट्रेनिंग’, VIDEO पाहिला का?
आपल्या चेंडूवर फलंदाजाने षटकार ठोकल्याने चिडला पाकिस्तानी गोलंदाज, तिखट खडाजंगीचा व्हिडिओ व्हायरल
गोलंदाजाने चेंडूच इतका खतरनाक टाकला की, स्टंपने केला डिस्को डान्स!! फलंदाज ब्रावोही चकित