टी२० विश्वचषक २०२१ मधील भारताचा पहिला सामना अवघ्या एका दिवसाच्या प्रतिक्षेवर आला आहे. २४ ऑक्टोबर रोजी दुबई येथे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने भारतीय संघ त्यांच्या टी२० विश्वचषक अभियानाची सुरुवात करणार आहे. उभय संघ या हाय व्होल्टेज सामन्याच्या तयारीत व्यस्त आहेत. तत्पूर्वी भारतीय संघाने आपल्या काही नेट गोलंदाजांना मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
टी२० विश्वचषकाच्या तयारीसाठी भारतीय संघासोबत ८ नेट गोलंदाजांनाही दुबईत थांबवले गेले होते. परंतु आता त्यातील ४ गोलंदाजांना भारतात परत पाठवण्यात आले आहे. यामध्ये फिरकीपटू वेंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाज नदीम आणि कृष्णप्पा गौतम यांचा समावेश आहे. भारतात होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या स्पर्धेसाठी हे खेळाडू मायदेशी परतले आहेत.
तर विराट कोहली आणि संघाच्या मदतीसाठी इतर ४ नेट गोलंदाजांना थांबवून ठेवण्यात आले आहे. आवेश खान, उमरान मलिक, हर्षल पटेल आणि ल्यूकमान मेरिवाला अशी त्यांची नावे असून ते टी२० विश्वचषकाच्या अखेरपर्यंत भारतीय संघासोबत राहतील. न्यूज एजन्सी पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
…म्हणून नेट गोलंदाजांना परत पाठवले
भारतीय संघाला सुपर १२ फेरीत आपल्या गटामध्ये एकूण ५ सामने खेळायचे आहेत. त्यानंतर जर संघाने पुढील टप्प्यात पात्रता मिळवली तर ते उपांत्य फेरी सामना आणि अंतिम सामना खेळतील. या सामन्यांदरम्यान भारतीय संघाला सरावाला फार दिवसांचा कालावधी मिळणार नाही. त्यामुळे त्यांचे सराव सत्रही फार कमी प्रमाणात होतील. याच कारणास्तव बोर्डाने नेट गोलंदाजांना भारतात परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याविषयी पीटीआयला सांगितले की, “टी२० विश्वचषक अभियानाची सुरुवात झाल्यानंतर जास्त सराव सत्र होणार नाहीत. त्यामुळे या नेट गोलंदाज म्हणून युएईत थांबलेल्या खेळाडूंना मायदेशी परतल्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेद्वारे सराव करण्याची संधी मिळेल, असे संघ निवडकर्त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.” मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा ४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आजपासून रंगणार सुपर १२ सामन्यांचा थरार, ‘या’ ११ खेळाडूंसह उतरतील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघ






